Thursday 26 July 2012

आद्य महिला स्वातंत्र्य सेनानी - भीमाबाई होळकर !

आद्य महिला स्वातंत्र्य सेनानी भीमाबाई होळकर यांच्या २१५ व्या जयंती निमीत्त सादर अभिवादन... (२७ जुले १७९७)

आद्य महिला स्वातंत्र्य सेनानी भीमाबाई होळकर !

जागतीक पातळीच्या इतिहाससंशोधकांनी आद्य महिला स्वातंत्र्य सेनानीचा सन्मान दिलेल्या भीमाबाई होळकरांना आमच्या इतिहासाने मात्र काळाच्या कालकुपीत दफन करुन ठेवले आहे, हे एक दुर्दैवच आहे. आज जागतीक महिला दिनाच्या निमित्ताने अठराव्या शतकात शिक्षित असलेली, परंपरेच्या जोखडाखाली वाढवली गेलेली, पिता यशवंतराव होळकरांच्या पावलावर पाउल ठेवत ब्रिटिशांशी सर्वकश युद्ध पुकारणारी ही महान वीरांगना. तिच्याबद्दल येथे आपण थोडक्यात माहिती करुन घेवुयात.
भीमाबाईंचा जन्म १७९७ साली पुणे येथे झाला. आईचे नांव लाडाबाई तर पिता भारताचे आद्य स्वातंत्र्य सेनानी यशवंतराव होळकर. दौलतराव शिंदेंनी सत्तालालसेमुळे मल्हारराव होळकर (दुसरे) यांचा पुण्यात खुन केला. यशवंतराव व विठोजींच्याही जीवावर शिंदे उठल्याने उभयतांना पुण्यातुन निसटुन जावे लागले. शिंद्यांनी त्याचा सुड असा घेतला कि नवजात भीमाबाई आणि माता लाडाबाईला कैदेत टाकले. त्यांची सुटका यशवंतरावांनी २५ आक्टोबर १८०२ रोजी पुण्यावर स्वारी करुन शिंदे व पेशव्यांचा दणदणित पराभव केल्यानंतर झाली. तब्बल सहा वर्ष या वीरांगनेला मातेसह कैदेत रहावे लागले. सुटकेनंतर मात्र यशवंतरावांनी भीमाबाईच्या शिक्षनाची व लष्करी प्रशिक्षणाची सुरुवात केली. ब्रिटिश विदुषि मेरी सदरल्यंड म्हणतात, ज्या काळात भारतात महिलांना गोषात रहावे लागे, शिक्षणाचा विचारही नव्हता, अत्यंत बंदिस्त व मानहानीचे जीवन जगावे लागे त्या काळात, यशवंतरावांसारख्या द्रष्ट्या पुरुषाने भीमाबाईला शिक्षण देने व लढवैय्याही बनवणे ही एक क्रांतीकारक घतना होती. अर्थात अशी सामाजिक क्रांती होळकर घराण्याला नवीन नव्हती. अहिल्याबाई होळकर स्वत: शिक्षित तर होत्याच पण त्या काळात भालाफेकीत त्यांचा हात धरणारा कोनी पुरुषही नव्हता. एवढेच नव्हे तर जगातील पहिले महिलांना लष्करी प्रशिक्षण देणारे विद्यालयही स्थापन करुन महिलांची बटालियन उभारली होती. या बटालियनला घाबरुन रघुनाथराव पेशव्यालाही पळुन जावे लागले होते.
यशवंतरावांचा ब्रिटिशांशी संघर्ष सुरु असला व एका मागोमाग एक अशा अठरा युद्धांत त्यांना पराजित करत राहिले असले तरी परिवाराकडे त्यांनी दुर्लक्ष केले नाही. भीमाबाईचा विवाह धारचे संस्थानिक गोविंदराव बुळे यांच्याशी झाला. यशवंतरावांनी आपल्या लाडक्या कन्न्येला पेटलवाड येथील जहागीरही व्यक्तिगत उत्पन्नासाठी दिली. परंतु विवाहानंतर दोनेक वर्षातच भीमाबाईवर वैधव्य कोसळले. त्या परत माहेरी आल्या व यशवंतरावांनी भानपुरा येथे सुरु केलेल्या तोफांच्या कारखान्याचे व नवीन लष्कर भरतीचे काम पाहु लागल्या. त्यांना उत्तम अस्वपरिक्षा अवगत होती. त्यामुळे भारतभरातुन यशवंतरावांनी एक लक्ष घोडे आपल्या सैन्यासाठी विकत घ्यायचा सपाटा लावला होता त्यात मुख्य भुमिका भीमाबाई बजावत होत्या. यशवंतरावांचा भारतीय स्वातंत्र्यासाठी कलकत्त्यावर इस्ट इंडिया कंपनीच्या मुख्यालयावरच हल्ला करण्याचा बेत होता. पण दुर्दैवाने मेंदुतील गाठीच्या आजाराने यशवंतरावांचा २८ आक्टोबर १८११ रोजी भानपुरा येथे अकाली म्रुत्यु झाला. त्यावेळीस भीमाबाईंच्या धाकट्य भावाचे, मल्हारराव तिसरा याचे वय होते फक्त सहा वर्ष. महाराणी तुळसाबाई या मल्हारराव (तिसरे) यांच्या रीजंट म्हणुन कारभार पहात असतांना भीमाबाई लष्करी फेररचनेत व्यस्त होत्या. यशवंतरावांच्या म्रुत्युमुळे होळकरी सम्स्थान ताब्यात घेता येईल या कल्पनेत इंग्रज रमाण होते व तसा प्रयत्नही करत होते, पण त्यांना यश येत नव्हते. कारण तत्कालीन भारतात होलकरांचे लष्कर बलाढ्य मानले गेलेले होते. शेवटी इंग्रजांनी कपटनीतिचा आश्रय घेतला. गफुरखान या होळकरांच्या सेनानीला त्यांनी जाव-याची जहागिरी देण्याचे आमिष दाखवत फोडले. या घरभेद्याने १९ डिसेंबर १७१७ रोजी महाराणी तुळसाबाईंचा निर्दय खुन केला व त्यांचे प्रेत क्षिप्रा नदीत फेकुन दिले.
त्याच वेळीस भीमाबाई आणि मल्हारराव (तिसरे) सर थोमस हिस्लोप या माल्कमने पाठवलेल्या ईंग्रज सैन्याचा सेनापतीशी मुकाबला करण्याच्या तयारीत महिदपुर येथे होते. मल्हाररावाचे वय त्यासमयी फक्त बारा वर्षाचे होते तर भीमाबाईचे वय होते वीस. त्या घोडदळाचे नेत्रुत्व करत होत्या. २० डिसेंबरला सकाळी युद्ध सुरु झाले. दुपारी तीन वाजेपर्यंत होळकरी सेना इंग्रजांना कापुन काढत विजयाच्या क्षणापर्यंत पोहोचली होती. पण ऐन मोक्याच्या वेळी गफुरखान आपल्या सैन्यासह रणांगणातुन निघुन गेला. हाती आलेला विजय त्याच्या गद्दारीमुळे निसटला. याबाबत लुत्फुल्लाबेग नामक तत्कालीन इतिहासकार लिहितो कि, जर गफुरखानाने जागिरीच्या लोभापाई गद्दारी केली नसती तर इंग्रजांचे नाक ठेचले गेले असते व त्यांना भारतावर राज्य करणे अशक्य झाले असते.
या युद्धानंतर मल्हाररावाला इंग्रजांशी मंदसोर येथे तह करावा लागला. पण भीमाबाई मात्र आपल्या तीन हजार पेंढारी घोडदळानिशी निसटली होती. इंग्रजांशी तिचा लढा थांबणार नव्हता. तिने अक्षरश: अरण्यवास पत्करला व पित्याच्या पावलावर पाऊल ठेवत गनीमी काव्याचा मंत्र जपला. तिने माल्कमच्या सैन्यावर गनीमी हल्ले सुरु केले. इंग्रज खजीने लुटले. अनेक तळ उध्वस्त केले. मार्च १८१८ मद्धे तर खुद्द माल्कमच्या सेनेला अचानक हल्ला करुन असे झोडपले कि माल्कमलाच पळुन जावे लागले. इंग्रजांनी भीमाबाईची खरी शक्ती तिचे पेंढारी इमानदार सैन्य आहे हे लक्षात घेवुन पेंढा-यांविरुद्धच मोहीम हाती घेतली. पेंढा-यांना पुनर्वसनाच्या, जमीनी-जागीरी देण्याच्या आमिषांचीही बरसात केली. त्यामुळे अनेक पेंढारी भीमाबाईला सोडुन जावु लागले. आपल्या पित्याप्रमानेच भीमाबाईने भारतातील सम्स्थानिकांना बंड करण्याची पत्रे पाठवण्याचा सपाटा लावला होता पण कोणीही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. माल्कम तर पिसाळुन भीमाबाईच्या सर्वनाशासाठे भीमाबाईचा माग काढत होता, पण भीमाबाई आज येथे तर उद्या तिथे. तिने इंग्रजी तळांना अचानक हल्ले करुन लुटण्याचा धडाका लावलेला होता. भीमाबाईवरील मोहीम यशस्वी व्हायचे नांव घेत नव्हती. माल्कमने पुन्हा कपटाचा आश्रय घेतला. त्याने भीमाबाईचा मुख्य सेनानी रोशन खान ह्यालाच फितुर करुन घेतले. भीमाबाईचा तळ धारनजिक पडला असतांना त्याने ती खबर माल्कमला दिली. माल्कमने तातडीने विल्ल्यम केइर या नजिक असलेल्या सेनानीला भीमाबाईवर हल्ला करण्यास पाठवले. चहुबाजुंनी घेराव पदला. यावेळीस दुर्दैव असे कि एकाही सैनिकाने शस्त्र उचलले नाही. ते सरळ भीमाबाईला एकाकी सोडुन निघुन गेले. भीमाबाईला कैद करण्यात आले. रामपुरा येथील गढीत त्यांना बंदिस्त करण्यात आले. पुढे नोव्हेंबर १८५८ मद्धे भीमाबाईंचा म्रुत्यु झाला. कैदेतच जन्म आणि कैदेतच म्रुत्यु असे दुर्दैव या थोर महिलेच्या वाट्याला आले. पुढचे दुर्दैव हे कि ज्या अखिल भारताच्या स्वातंत्र्यासाठी जिने संगर मांडला तिला भारतवासी चक्क विसरुन गेले. ती काही आपल्या संस्थानासाठी लढत नव्हती...ते शाबुतच होते...पण आम्हाला झाशीची राणी, जी फक्त आपल्या दत्तकविधानासाठी लढली, ती माहित असते...पण ही वीरांगना?


-- संजय सोनवणी ( Mob : 09860991205 )

Saturday 21 July 2012

गनिमी कावा आणि उत्तर हिंदुस्थान ...!


  प्रसिद्ध जातीयवादी इतिहासकार विश्वास पाटील ह्याने आपल्या पानिपत या कादम्बरीमध्ये उत्तर हिंदुस्तानाच्या सपाट मैदानी प्रदेशात गनिमीकावाच्या अवलंब करता येणे शक्य नाही असे नमूद करून एक प्रकारे मल्हारराव होळकर यांचा गानिमी काव्याचा सल्ला हा चुकीचा सल्ला ठरवून त्याने आपल्या सुमार बुद्धीचे प्रदर्शन केले.

 गनिमी कावा म्हणजे नुसते डोंगरावरून दगडफेक करणे अशी समजूत असणाऱ्या लोकांची ही गोड समजूत दूर करण्यासाठी मी तरुण इतिहास संशोधक, पानिपत युद्धाचे आधुनिक भाष्यकार श्री. संजय क्षीरसागर यांचा गनिमी कावा आणि उत्तर हिंदुस्थान ...! हा लेख प्रसिद्ध करत आहे.


गनिमी कावा आणि उत्तर हिंदुस्थान ...!


 मराठी राज्याच्या इतिहासात पानिपत प्रकरणाचा अपवाद केल्यास उत्तर हिंदुस्थानात गनिमी काव्याच्या बळावर लष्करी मोहिमा यशस्वी होऊ शकतात कि नाही याविषयी फारशी चर्चा कोणत्याही इतिहासकाराने, विशेषतः मराठी इतिहास लेखकांनी, केल्याचे अजून तरी माझ्या निदर्शनास आले नाही.
     सामान्यतः उत्तर हिंदुस्थानात गनिमी कावा हा यशस्वी होऊच शकत नाही अशी कित्येक इतिहासलेखकांची व अभ्यासू वाचकांची समजूत आहे. परंतु, हि समजूत अथवा हा ग्रह साफ चुकीचा आहे. पेशवेकालीन मराठी राज्याचा पानिपतपूर्व अथवा पानिपत नंतरचा इतिहास पाहिल्यास हि बाब लक्षात येईल. पानिपतपूर्व काळात बाजीराव पेशव्याच्या जवळपास सर्व मोहिमा या गनिमी काव्याच्या बळावरचं यशस्वी झाल्याचे दिसून येते. बाजीराव पेशव्यानंतर नानासाहेब पेशव्याच्या कारकिर्दीमधील सर्व मोहिमा गनिमी काव्याच्या बळावरचं पार पाडल्याचे लक्षात येते. यामध्ये रघुनाथरावाची अटकस्वारी देखील समाविष्ट आहे.
       पानिपत स्वारीचा विचार करताना, पानिपतपूर्व अटक मोहीम हि गनिमी काव्याच्या बळावर यशस्वी झाली होती हि बाब नेहमी दृष्टीआड केली जाते. निव्वळ गनिमी काव्याचा अवलंब करून रघुनाथराव, होळकर, विंचुरकर इ. सरदारांनी दिल्ली, पंजाब पादाक्रांत करून पुढे अटकेपार धडक मारली होती. तसेच या फौजेत गारदी सैन्य नव्हते हे लक्षात घेता उत्तर हिंदुस्थानात गनिमी काव्याचे धोरण यशस्वी होत नाही या विधानामधील फोलपणा स्पष्ट होतो. पानिपत मोहिमेत गारदी सैन्याचा समावेश केल्यामुळे गनिमी काव्याचे धोरण सदाशिवरावास स्वीकारता आले नाही असाही एक युक्तिवाद केला जातो पण त्यात अजिबात दम नाही. याचे कारण म्हणजे, उदगीर स्वारीत गारदी पथकाचा समावेश असूनही ती मोहीम मराठ्यांनी आपल्या परंपरागत गनिमी काव्याच्या सहाय्यानेचं यशस्वी केल्याचे दिसून येते. मग प्रश्न असा पडतो कि, पानिपत मोहिमेत गनिमी काव्याचे धोरण का स्वीकारले गेले नाही ?
          माझ्या मते, गनिमी कावा आणि कवायती पायदळाच्या सहाय्याने खुल्या मैदानात दिलेली लढाई यामध्ये निश्चित असा फरक आहे. पण हा फरक, त्या त्या पद्धतीचा अवलंब करून मिळणाऱ्या यशाच्या बाबतीत आहे हे प्रथम लक्षात घेणे गरजेचे आहे. गनिमी काव्याच्या सहाय्याने तुम्ही शत्रूला हैराण करू शकता परंतु त्याचा समूळ नाश करणे तुम्हाला शक्य होत नाही. उदाहरणार्थ पालखेड किंवा भोपाळ या ठिकाणी बाजीरावाने आपल्या कल्पक शक्तीचा पुरेपूर वापर करून निजामाला चांगलेचं कोंडीत पकडले होते पण .... पण निजामाच्या सैन्याचा तो पूर्णतः निःपात करू शकला नाही. परिणामी, निजामाचे लष्करी बळ कायम राहून मराठी राज्याला उपद्रव देण्यास तो मोकळा राहिला. नानासाहेब पेशव्याने देखील आपल्या कारकीर्दीमध्ये वेळोवेळी निजामावर मोहिमा काढून त्याचा पराभव केला. परंतु, निजामाचे लष्करी सामर्थ्य नष्ट करण्यात त्याला यश मिळाले नाही. सदाशिवराव हा कुशल सेनानी होता कि नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकतो पण गनिमी कावा व तोफखान्याच्या सहाय्याने खेळले जाणारे मैदानी युद्ध यातील फरक त्याच्या लक्षात आला असावा. गारदी पथके आणि सुसज्ज तोफखान्याच्या बळावर वारंवार दिल्लीवर चालून येणाऱ्या अफगाण टोळधाडीचा खरपूस समाचार घेण्याचा त्याचा विचार नसेलचं असे म्हणता येत नाही. त्यामुळेचं त्याने पानिपत मोहिमेत गनिमी कावा न स्वीकारता मैदानी युद्धाचे धोरण स्वीकारल्याचे दिसून येते. वास्तविक, गनिमी कावा आणि कवायती पायदळ या दोन्हींचा उपयोग करून देखील तो पानिपत मोहीम चालवू शकत होता परंतु, तो काळ हिंदुस्थानातील लष्करी डावपेचांच्या संक्रमणाचा काळ होता हे लक्षात घेता सदाशिवरावास फारसा दोष देता येत नाही. या ठिकाणी दखल घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्रजांना मराठी सरदारांवर नियंत्रण बसवण्यात यश मिळाले याचे कारण म्हणजे मराठ्यांचा गनिमी कावा त्यांनी आत्मसात करून त्याला आपल्या कवायती पायदळ सैन्याची जोड दिली हे आहे. परंतु, हे लक्षात येण्यासाठी त्यांना पहिल्या इंग्रज मराठा युद्धात सपाटून मार खावा लागला होता. असो, पानिपत युद्धानंतर उत्तर हिंदुस्थानात मराठी सरदारांनी अनेक मोहिमा पार पाडल्या. त्या सर्व मोहिमा या गनिमी काव्याच्या बळावर यशस्वी झाल्या. यापैकी एका मोहिमेची या ठिकाणी माहिती देऊन या प्रकरणाचा समारोप करतो.
    बक्सारची लढाई २३ ऑक्टोबर १७६४ रोजी घडून आली. त्यामध्ये सुजा, बंगालचा पदभ्रष्ट नवाब मीर कासीम व बादशहा शहाआलम यांचा इंग्रजांनी पराभव केला. हा पराभव जिव्हारी लागून सुजाने शिंदे होळकरांची मदत मागितली.
सुजाने मदत मागितल्यावर होळकर त्याच्या सहाय्यास धावला. सुजा, होळकर व गाजीउद्दिन असे तिघेजण इंग्रजांविरुद्ध लढण्यास उभे राहिले. इंग्रजांच्या बाजून मेजर फ्लेचर हा लष्कराचे नेतृत्व करीत होता. तो अलाहाबादवरून या त्रिवार्गाच्या रोखाने चालून आला. त्यावेळी होळकराने गनिमी काव्याचा अवलंब करून त्याला पुष्कळ हैराण केले. होळकराचे धोरण लक्षात घेऊन फ्लेचर याने ३ मे १७६५ रोजी कुराच्या मैदानावर होळकरासोबत लढाई केली. त्या लढाईचे वर्णन आप्पाजीराम याने पुरंदऱ्यास २७ जून १७६५ च्या पत्रात लिहून कळवले आहे. ते पत्र खाली देत आहे.
तदनंतर फिरंगी चालोन आले, त्यांशीं झुंज मातबर झालें. चारपांचशें घोडे, चाळीस पन्नास उंटें व तीन तोफा आणल्या. तेही दम धरून मुक्कामास आले. आम्ही घेरा घालोन होतों, तों बातमी आली, रोहिले पठाण एकत्र होऊन बुणग्यावर आले. मग तैसेच चालोन काल्पीस बुणगे उतरून पुनः गंगाधरतात्यास फौज देऊन रवाना केलें. तेथें एक लढाई जाली. हरोळ तमाम बुडविला. फिरंग्यांची दोन पलटणें, हजार घोडे, चारशें उंटें, बाणांच्या कैच्या, वीस पंचवीस निशाणें आणलीं. ते गावाचा आश्रय करून राहिले. तेथें चार सहा कोस पावेतों फौजांस पाणी नव्हतें, यामुळें उलटोन ( तात्या ) काल्पीस आले, नाकेबंदी केली. मग चारपांच नावा मेळऊन रातबा धरून ( ते फिरंगी ) यमुना उतरले, तोफाखालीं मोर्चे उधळले. चारपांच घडी युद्ध जालें. परंतु बेदड ( चिखलांत रुतलेली वनस्पतींची मुळें ) भारी त्यामुळें घोड्यांचा नाइलाज झाला. म्हणून गनिमीकावा देऊन बेदड पुढें देऊन उभे राहिलों. इंग्रज काल्पींत ठाणें बसवून माघारे गेले. आम्ही उलटोन त्यांचें ठाणें काढून आपले ठाणें बसविलें. तेथून उमरगडचा बंदोबस्त करून ग्वाल्हेर प्रांतें चाललों आहों. ( मराठी रियासत खंड ५ )
   इंग्रजांच्या कवायती पलटणींना होळकराने निव्वळ गनिमी काव्याच्या बळावर चांगलेच हैराण केल्याचे उपरोक्त पत्रावरून तर सिद्ध होतेचं पण त्याशिवाय इंग्रजांना दहशत बसेल इतपत त्याने त्यांच्या पलटणींचा समाचार घेतल्याचे देखील वरील पत्रावरून लक्षात येते. होळकर आणि इंग्रज यांचा जिथे सामना घडून आला ती सर्व स्थळे उत्तर हिंदुस्थानातील आहेत व त्या ठिकाणी मल्हाररावाने गनिमी काव्याचा अवलंब करून इंग्रजांना जेरीस आणले हे लक्षात घेता उत्तर हिंदुस्थानची भूमी मराठ्यांच्या गनिमी काव्याच्या धोरणास अजिबात अनुकूल नव्हती असे जे सांगितले जाते ते साफ चुकीचे असल्याचे दिसून येते. त्याशिवाय या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे व ती म्हणजे ब्रिटीश पलटणी या अफगाण सैन्यापेक्षा, लष्करी बाबतीत कितीतरी पटींनी श्रेष्ठ होत्या पण असे असूनही होळकरी फौजेपुढे त्यांना माती खावी लागली होती. यावरून होळकराच्या लष्करी नेतृत्वाचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे.      






















Tuesday 17 July 2012

अखेरचा सार्वभौम राजा - महाराजा यशवंतराव होळकर

अखेरचा सार्वभौम राजा

-संजय सोनवणी

संकटांची वादळे, युद्धांचा सतत झंझावात, सतत विजयांची आस, स्वातंत्र्याची आस, विश्वासघात सहज पचवत पुढे जाण्याची तयारी, अफाट नेतृत्वक्षमता, पराकोटीचे युद्धकौशल्य, नितांत दुर्दम्य आशावाद, प्रयत्नांची निराश न होता केलेली पराकाष्ठा, क्षमाशीलता, शत्रूशी दुर्दात क्रुरता असे सर्व गुण एकत्र असणारा महायोद्धा व राज्यकर्ता यशवंतराव होळकर यांची दोनशेवी पुण्यतिथी येत्या २८ ऑक्टोबरला आहे. त्या निमित्ताने यशवंतराव होळकरांच्या कर्तृत्वाचा घेतलेला हा वेध...

यशवंतराव होळकरांचा (३-१२-१७७६ ते २८-१०-१८११) एकूण जीवनप्रवास थक्क करणारा आहे. असा थरारक रोमांचक जीवनप्रवास, संकटांची एवढी वादळे, युद्धांचा सतत झंझावात, सतत विजयांची आस, स्वातंत्र्याची आस, विश्वासघात सहज पचवत पुढे जाण्याची तयारी, अफाट नेतृत्वक्षमता, पराकोटीचे युद्धकौशल्य, नितांत दुर्दम्य आशावाद, प्रयत्नांची निराश न होता केलेली पराकाष्ठा, क्षमाशीलता, शत्रूशी दुर्दात क्रूरता असे सर्व गुण एकत्र असणारा महायोद्धा व राज्यकर्ता जगाच्या इतिहासात क्वचितच सापडेल.
यशवंतरावांना राज्य सोडा साधी बोटभर जहागीर वंशपरंपरेने मिळालेली नाही. ती त्यांना भिल्ल-पेंढारी व पठाणांच्या स्वत: उभारलेल्या अल्प सन्याच्या जिवावर प्रशिक्षित पलटनींशी लढून मिळवावी लागली. त्यांनी िशदे-पेशव्यांच्या घशातून जप्त झालेले होळकरी प्रांत अविरत लढत-लढतच मुक्त केले. एवढेच काय, पण िशद्यांनी कैदेत टाकलेली पत्नी आणि अल्पवयीन कन्येलाही लढूनच मुक्त केले. गादीचा खरा वारसदार खंडेरावाला मुक्त करण्यासाठी आयुष्य पणाला लावले. त्यांना स्वत:ला इंदोरी गादीची हाव कधीच नव्हती, हे त्यांच्या सर्व कृत्यांवरून सिद्ध होते. आणि हे सर्व प्रांत त्यांनी जिंकलेले होते. एका अर्थाने त्यांनी संपूर्णपणे नव्याने राज्याची पायाभरणी केली होती. शिवरायांनंतर स्वत:चे राज्य स्वत:च्या हिमतीवर मिळवणारा, शेवटपर्यंत स्वतंत्र राहणारा, स्वत:हून एकही तह कोणाशीही न करणारा हा एकमेव महायोद्धा होता.
दौलतराव िशद्यांनी व पेशव्यांनी त्यांच्यावर व त्यांच्या परिवारावर आपत्तीमागून आपत्ती कोसळवल्या. दुसऱ्या मल्हाररावांचा खून केला. यशवंतराव व विठोजीरावांना कोवळ्या वयात आश्रयासाठी वणवण भटकावे लागले. रघोजी भोसल्यांनीही विश्वासघात केला. त्या क्षणापासून यशवंतरावांचे जीवन पूर्ण पालटलेले दिसते. त्यांनी स्वत: आपला मार्ग निर्माण केला, स्वत:च स्वत:चे नियम बनवले आणि आपली अविरत वाटचाल सुरू ठेवली.

अनेकदा अनेक इंग्रज इतिहासकार यशवंतरावांवर क्रौर्याचा आरोप करतात. हे खरे आहे की यशवंतरावांनी युद्धात शत्रूच्या भीषण कत्तली केल्या. मग युद्धे असतात कशासाठी? लुटूपुटूची युद्धे करून शत्रूला सन्मानपूर्वक जिवंत घरी धाडण्यासाठी?

पेशव्यांकडे व दौलतरावांकडे त्यांच्या सतत त्याच मागण्या होत्या.. खंडेरावाला व होळकरी परिवाराला मुक्त करा, होळकरी प्रांतांवरले जप्तीचे हुकूम मागे घ्या, दौलतरावांशी समेट करून द्या. खरे तर तोवर त्यांची स्वत:चीच शक्ती एवढी वाढली होती की पेशव्यांवर आक्रमण करून पेशवाई बुडवून ते आपल्याला हवे ते साध्य करू शकत होते. पण त्यांनी पेशव्यांच्या मसनरीचा, त्यांच्या सर्वोच्च अधिकारांचा नेहमीच आदर ठेवला. पेशव्यांनी त्यांचा थोरला भाऊ विठोजीरावाला अत्यंत क्रूरतेने ठार मारले. शत्रूलाही कोणत्याही राजसत्तेने अशी शिक्षा दिलेली नाही, तरीही संतापाच्या भरात आततायी कृत्य करणे त्यांनी टाळले. तत्पूर्वी िशद्यांनी मल्हारराव (दुसरा) या सावत्रभावाचीही हत्या केली होती. पेशवे नव्हेत तर िशदे हेच आपले शत्रू आहेत, एवढीच खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली. हडपसरच्या युद्धात त्यांनी स्वत: ऐन जंगेत उतरून जो पराक्रम गाजवला त्याचे गुणगान त्यांचा कट्टर शत्रू मेजर माल्कमही करतो. खरे तर पेशव्यांनी यशवंतरावांच्या पराक्रमाचा दौलतीसाठी उपयोग करण्याची थोडीतरी दूरदृष्टी दाखवली असती, तर इंग्रजांचे राज्य या देशात कदापि आले नसते, हे यशवंतरावांनी एकटय़ाच्या जिवावर इंग्रजांशी जी युद्धे केली-जिंकली त्यावरून सहज स्पष्ट होते.
त्यांनी पुणे जाळले-लुटले हा धादांत खोटा आरोप करून पुणेकर सनातन्यांनी त्यांना महाराष्ट्रात पुरते बदनाम करून टाकले. अगा जे घडलेच नाही त्याच्या खोटय़ा रसभरीत कहाण्या बनवल्या गेल्या. पेशवा पळून गेला. त्याला परत आणायचा यशवंतरावांनी पराकोटीचा आटापिटा केला.. पण पेशवा पेशवाई इंग्रजांना विकून बसला. त्याचेही खापर जदुनाथ सरकार यशवंतरावांवरच फोडतात. एवढे होऊनही यशवंतरावांनी कोठेही पेशव्यांबद्दल कटू उद्गार काढलेले नाहीत. ही बाब यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वावर वेगळाच प्रकाश टाकते. पण पुणेकरांनी त्यांची गणना ‘प्रात:काळी ज्यांची नावे घेऊ नयेत’ अशा त्रयीत करून टाकली. बंडवाला होलकर.. होळकरी दंगा असे शब्दप्रयोग वापरले. लाखावरच्या सन्याचा अधिपती, स्वतंत्र सार्वभौम राजाला त्यांनी बंडखोर-दंगेखोर ठरवले. मराठीत यशवंतरावांवर फारसे का लिहिले गेले नाही, जेही लिहिले गेले ते प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या त्यांची बदनामी करणारेच होते यात शंका नाही.
वसईचा तह झाल्यानंतर इंग्रजांच्या आसुरी आकांक्षांचा अंदाज आलेला हा पहिला भारतीय शासक. िशदेंशी परंपरागत हाडवैर असूनही, त्यांनी होळकरांचे एवढे अपराध केले असूनही त्यांनी िशदेंना व भोसलेंना इंग्रजांविरुद्ध एकत्र आणले. िशदेंनी काय केले, तर होळकरांच्याच नाशाच्या योजना आखल्या. जर नर्मदेच्या तीरी हे िशदे व भोसले मनात कपट न ठेवता होळकरांची साथ देत तिघे इंग्रजांविरुद्ध र्सवकष लढा देते तर? यशवंतराव दिल्लीवर चालून गेले तेव्हाच भोसले यशवंतरावांच्या सूचनेनुसार खरेच कलकत्त्यावर चालून जाते तर? किंवा आपापल्या बळावर इंग्रजांशी सुनियोजित लढा देते तर? पण तसे झाले नाही. यशवंतरावांतील धगधगते राष्ट्रप्रेम आणि इंग्रजांचा खरा धोका त्यांना समजलाच नाही. त्याची परिणती त्यांच्याच अवमानास्पद पराभव व मांडलिकत्वाच्या तहांत झाली.
यशवंतरावांच्या दूरदृष्टीला दाद देत असता या करंटय़ा सरदारांच्या आत्मघातकी कृत्यांबाबत कोणालाही रोष वाटणे स्वाभाविक आहे.

यशवंतरावांत एक अद्भुत चतन्य सळसळत असायचे. निराशा त्यांना माहीत नव्हती. पराकोटीची व्यक्तिगत संकटे कोसळूनही त्यांनी मनाचे संतुलन ढळू दिले नाही. त्यांच्या स्वत: मदानात सनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याच्या वृत्तीमुळे अनेकदा संभाव्य पराजयही त्यांनी विजयात बदलवले आहेत. यशवंतरावांना भारताचा नेपोलियन का म्हणतात हे यावरून लक्षात यावे.

यशवंतरावांची युद्धनीती इंग्रजांना नेहमीच बुचकळ्यात टाकत राहिली. गनिमीकाव्याचा खरा उपयोग शिवरायांनंतर केला तो फक्त यशवंतरावांनी. गनिमीकावा हा फक्त पहाडी प्रदेशांत उपयुक्त असतो हे खोटे आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. मोन्सनचा भीषण पराभव हा गनिमीकाव्याचा अभिनव आणि कल्पक नमुना होता. युद्धशास्त्राच्या अंगानेही त्याचे विश्लेषण व्हायला हवे. आधी शत्रूला आपल्या मागे आणून, मग त्याला उलटे पळायला लावून, बदलत्या हवामानाचा अंदाज ठेवून भर पावसाळ्यात गाळाच्या जमिनीत त्याची फजिती करत तब्बल २५० मल पाठलाग करत, क्रमाक्रमाने त्याची शक्ती कमी करत नेत कसे संपवावे याचे हे एकमेव उदाहरण. या युद्धात इंग्रजांचे दहा हजारापेक्षा अधिक सन्य ठार झाले..
यामुळेच अनेकदा अनेक इंग्रज इतिहासकार यशवंतरावांवर क्रौर्याचा आरोप करतात. हे खरे आहे की यशवंतरावांनी युद्धात शत्रूच्या भीषण कत्तली केल्या. मग युद्धे असतात कशासाठी? लुटूपुटूची युद्धे करून शत्रूला सन्मानपूर्वक जिवंत घरी धाडण्यासाठी? यशवंतरावांचे युद्ध धोरण शक्यतो आक्रमकच असे. ते तसेच असले तरच विजय मिळतात. कर्नल फोसेटवर त्यांनी इशाऱ्याची लढाई केली त्यातही त्यांनी त्याच्या दोन पलटणी कापून काढल्या. त्यामुळे इंग्रज वचकला. कधी आक्रमक व्हायचे, कधी शत्रूला सावकाश जेरीस आणत मग संपवायचे, कोठे युद्ध टाळायचे याचे त्यांचे स्वत:चे आडाखे होते आणि ते बव्हंशी यशस्वी झालेले आहेत. यशवंतरावांच्या या आक्रमकतेचा व कथित क्रौर्याचा फटका सामान्य माणसाला बसल्याचे एकही उदाहरण नाही. त्यामुळेच आजही उत्तर भारतात यशवंतरावांचे पवाडे गायले जातात.
‘िहदवाणा हलको हुवा
तुरका रहयो न तत
अग्र अंगरेजा उछल कियौ
जोखाकियौ जसवंत..’
(िहदुस्तानचा एकमेव रक्षक आता राहिला नाही. िहदू समाजाचे बळ तुटले आहे. मुस्लिम बादशहाचे बळ तर पूर्वीच तुटले होते. यशवंतरावांच्या देहांतामुळे इंग्रज बेहद्द खूश झाले आहेत.) असे कवी चन सांदुने यशवंतरावांच्या मृत्यूनंतर लिहिले, यावरून उत्तर भारतात या पहिल्या स्वातंत्र्ययोद्धय़ाचा केवढा सन्मान आहे, याची मराठी वाचकांना कल्पना यावी.
खरे तर इंग्रजी सन्य हे त्यांच्या सन्यापेक्षा खूप प्रशिक्षित आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज होते. भारतातच काय फ्रान्समध्ये नेपोलियनलाही धूळ चारणारे हे इंग्रजी सन्य. त्यात इंग्रजांनी यशवंतरावांवर कोण सोडला तर जनरल जेरार्ड लेक. अत्यंत अनुभवी आणि कडवा सेनानी. त्याला यशवंतरावांनी भरतपूरच्या युद्धात धूळ चारली. त्याचा पराभव हा इंग्रजांच्या जिव्हारी लागणारा होता. जनरल स्मिथ, कर्नल मोन्सन, मरे, फोसेटसारख्या दिग्गजांचा पराभवही यशवंतरावांनी लीलया केला. याचे कारण म्हणजे यशवंतरावही आधुनिकतेचे भोक्ते होते. इंग्रजांएवढी नसली तरी त्यांच्या सन्याला त्यांनी पाश्चात्य शिस्त लावली होती. पेंढाऱ्यांसारख्या तशा बेशिस्त आणि बेबंद सन्यालाही त्यांनी आपल्या कडव्या शिस्तीच्या जोरावर कह्य़ात ठेवले होते. उज्जन व पुण्यावरील मोठय़ा विजयानंतरही त्यांनी पेंढाऱ्यांना शहरे लुटू दिली नाहीत. ज्यांनी प्रयत्न केले त्यांना हात-पाय तोडायच्या शिक्षा दिल्या. इंग्रजांनीही त्यांच्या या कठोर शिस्तप्रियतेचे कौतुक केले आहे. याउलट अन्य सरदारांच्या सन्यातील पेंढाऱ्यांचे वर्तन होते. खुद्द दौलतरावांच्या सन्यातील पेंढाऱ्यांनी पुणे, पुण्याचा परिसर ते पेशव्यांच्या अखत्यारीतील महाराष्ट्र किती निर्दयतेने लुटला याची अंगावर शहारा आणणारी वर्णने माल्कमनेच केलेली आहेत. पेंढारी त्यासाठीच कुप्रसिद्ध होते. पण यशवंतरावांनी त्यांच्या या वृत्तीवर कठोरपणे लगाम घालत त्यांच्या पराक्रमी प्रवृत्तींचा पुरेपूर उपयोग करून घेतला, यातच त्यांच्या सन्य व्यवस्थापनक्षमतेची चुणूक दिसते.

अहिल्याबाई व नंतर तुकोजीरावही गेल्यानंतर होळकरांचे राज्य बेवारस असून ते गिळता येईल असाच दौलतराव व बाजीराव पेशव्यांचा होरा होता. आणि ते शक्य केलेही. पण यशवंतराव एवढे पराक्रमी निघतील व जप्त केलेले होळकरी राज्य ते परत जिंकून घेतील याचा त्यांना अदमास आला नाही.

इंग्रजांनी यशवंतरावांना सतत लुटारू व दरवडेखोर-बंडखोर असे उल्लेखून बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे, पण ती इंग्रजांची जुनीच रीत आहे. शिवरायांनाही ते लुटारूच म्हणत असत. स्वाभाविक आहे. शत्रूची बदनामी करण्याची संधी कोणी सोडत नाही. पण वास्तव हे आहे की यशवंतरावांनी शत्रूकडून रीतसर खंडण्या वसूल केल्या. ज्यांनी नकार दिला त्यांच्याच विभाग-महालांची लूट केली. पण असे करत असताना त्यांनी हात लावला तो फक्त श्रीमंतांना. सामान्यांना नाही अन्यथा उत्तर भारतात त्यांचा जनमानसात सन्मान राहिला नसता. भवानी शंकर खत्रीने त्यांच्याशी गद्दारी केली नसती तर त्याच्या हवेलीला आजही ‘निमकहराम की हवेली’ असे म्हटले नसते. सन्य पोटावर चालते आणि त्याचा खर्च हरलेल्यांकडून वसूल करण्याची जुनी रीत आहे. अगदी आजही ती चालू आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने जपान ते जर्मनीवर ज्या जबरी खंडण्या लादल्या तो इतिहास तर अगदी अलीकडचाच आहे.
शत्रूला बदनामच करायचे झाले की कोणतेही कारण पुरते याचे हा आरोप म्हणजे एक नमुना आहे, यापलीकडे त्याला महत्त्व देण्याची आवश्यकता नाही.
तत्कालीन िहदवी राज्यकर्त्यांमध्ये आस्तित्वातच नसलेले यशवंतरावांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांना उमगलेली राष्ट्रभावना. १८५७चे बंडही जे झाले ते स्वत:ची संस्थाने सुरक्षित ठेवण्याकरता. राष्ट्रासाठी नाही. दुसऱ्या बाजीरावाला फक्त आपल्या गादीची पडली होती. निजाम, टिपु, बडोद्याचे गायकवाड, उत्तरेतील शिख महाराजे, नबाब, रजपूत राजे हे सर्वच आपापल्या संस्थानांपुरते पाहात होते आणि त्यामुळेच ते इंग्रजांचे मांडलिक/अंकितही बनत गेले. पण यशवंतरावांसमोर फक्त स्वत:चे राज्य कधीच नव्हते.. तर संपूर्ण देश होता. त्यासाठी ते सर्व राजेरजवाडय़ांना, िशदे-भोसलेंना जी पत्रे धाडत होते त्यातील राष्ट्रीयता दाहक आहे. ते पत्रांत म्हणतात..‘पहिले माझे राष्ट्र, माझा देश. आज धर्म, जात, प्रदेश याच्यापलीकडे जाऊन देश-राष्ट्रहित पाहण्याची गरज आहे. माझ्यासारखेच तुम्हा सर्वाना इंग्रजांविरुद्ध संघर्षांने युद्धास उभे राहिले पाहिजे.’ पुढे यशवंतराव भोसलेंना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, ‘पूर्वी स्वराज्यात ऐक्यता बहुत. येणे करोन आजपावेतो व्यंग न पडता एकछत्री अंमल फैलावला होता..’ स्वराज्याची आठवण करून देत यशवंतराव पुढे तेच स्वराज्य घरापुरते करण्यात जमीनदार ते सरदार कसे गर्क झाले आहेत ही कटु वस्तुस्थिती विषद करत खंत व्यक्त करतात.
एक राष्ट्र, परकियांची हकालपट्टा व एतद्देशियांचा अंमल हेच त्यांच्या संघर्षांमागील खरे आणि एकमेव कारण आहे. आणि १८०३ला त्यांनी सुरू केलेला हा संघर्ष मुळात स्वत:साठी नव्हताच, कारण त्यांचे स्वत:चे राज्य सुरक्षित होतेच. त्यांनी उत्तरेत १८०३ पासून ज्या मोहिमा केल्या त्या सर्वस्वी अन्य राजसत्तांना जागे करत इंग्रजांविरुद्ध बळ एकवटवण्यासाठी. त्यांनी ज्याही १८०३ नंतर लढाया केल्या त्या सर्वच्या सर्व इंग्रजांविरुद्धच्या आहेत. एतद्देशियांविरुद्ध एकही नाही हेही येथे लक्षात ठेवले पाहिजे. या सर्व लढायांत-युद्धांत ते अजिंक्य राहिले आहेत हेही उल्लेखनीय आहे.
माल्कम म्हणतो ते खरेच आहे. यशवंतरावांत एक अद्भुत चतन्य सळसळत असायचे. निराशा त्यांना माहीत नव्हती. पराकोटीची व्यक्तिगत संकटे कोसळूनही त्यांनी मनाचे संतुलन ढळू दिले नाही. त्यांच्या स्वत: मदानात सनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याच्या वृत्तीमुळे अनेकदा संभाव्य पराजयही त्यांनी विजयात बदलवले आहेत. यशवंतरावांना भारताचा नेपोलियन का म्हणतात हे यावरून लक्षात यावे. खरे तर नेपोलियनच यशवंतरावांपासून तर शिकला नाही ना असा प्रश्न उपस्थित होतो. कारण यशवंतराव आधी झाले. नेपोलियन पाठोपाठ. वाटर्लूचे युद्ध १८१५ मध्ये झाले. आणि भारतात अनेक फ्रेंच तेव्हा तत्कालीन राजकीय व सामरिक घटनांची नोंद घेत होते व त्या आपल्या मायदेशी कळवत होते. त्यातून नेपोलियन काही शिकलाच नसेल असे म्हणता येत नाही. या युद्धात भरतपूरच्या युद्धातील काही सेनानी नंतर सामील झाले होते. तेही म्हणतात भरतपूर वाटर्लूपेक्षा अवघड होते. हीच यशवंतरावांना जागतिक योद्धय़ांनी दिलेली सलामी आहे.
यशवंतराव िहदू धर्माचे अभिमानी जरी असले तरी त्यांनी अन्यधर्मीयांचा दुस्वास केल्याचे एकही उदाहरण नाही. अमिरखानाला तर ते सगा भाई मानत असत. अक्षरश: हजारोंचे मुस्लिम सन्य त्यांच्या पदरी होते. फ्रेंच-इंग्रज असे ख्रिस्ती सेनानी व सनिकही त्यांच्या पदरी होते. त्यांच्या सन्यात भिल्लांसह सर्व जातींचे लोक होते. दरबारात ब्राह्मण कारभारी होते. स्त्रियांबाबत त्यांची भूमिका उदार होती. आपली कन्या भीमाबाई हीस त्यांनी घोडेस्वारी ते सर्व शस्त्रास्त्रांचे शिक्षण दिले तसेच लिहायला-वाचायलाही शिकवले. तत्कालीन सामाजिक स्थितीत राजे-रजवाडय़ांच्या स्त्रिया या जनान्यात पर्दानशीन वा घुंघटात असायच्या. महाराणी तुळसाबाईंनाही त्यांनी आवश्यक ते शिक्षण दिले होते. त्यामुळेच यशवंतरावांनंतर त्या राज्यकारभार पाहू शकल्या. इंग्रजांना अखेर त्यांचा खूनही गफुरखानाला विकत घेऊनच करावा लागला. त्यांचा खून करण्याचे एकमेव खरे कारण म्हणजे त्या जिवंत असता आपल्याला होळकरी राज्य गिळता येणार नाही याची त्यांना पटलेली खात्री.
यशवंतरावांची शिस्त कठोर होती. आपले इंग्रज अधिकारी फितूर झाले आहेत हे कळताच त्यांनी त्यांना देहांत शासन दिले.
यशवंतरावांचे सर्वात मोठे आणि शिवरायांनंतरचे अद्वितीय कार्य म्हणजे त्यांनी जानेवारी १७९९ मध्ये करून घेतलेला वैदिक राज्याभिषेक. या राज्याभिषेकाची कधीच चर्चा होत नाही. यशवंतरावांना पेशव्यांनी अधिकृत कधीच राजवस्त्रे दिली नाहीत. तरी लोकमान्यतेसाठी व अन्य सरदारांनी आपले महत्त्व जाणावे व आपल्या कार्यात साथ द्यावी म्हणून त्यांनी राज्याभिषेक करून घेतला. एका धनगराचा आधुनिक काळातील हा एकमेव राज्याभिषेक. त्याचे ऐतिहासिक मोल अद्याप आपल्याला समजावयाचे आहे.

यशवंतरावांना जिंकता येत नाही म्हणून वेलस्लीसारख्या गवर्नर जनरलची हकालपट्टी इंग्रज सरकारला करावी लागली. भारताबाबतची धोरणे बदलावी लागली. जगात अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रज सेनेची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगली गेली.

यशवंतरावांना िहदी, पíशयन, उर्दू, मराठी व संस्कृत भाषा येत असत हे वेगवेगळ्या ठिकाणी माल्कमनेच नोंदवून ठेवले आहे. ते स्वत: सर्वच शस्त्रास्त्रे उत्तमरीत्या चालवत असत. बंदुकीवर त्यांचे विशेष प्रेम होते. एकदा नेमबाजीचा सराव करत असता तोडा फुटून झालेल्या स्फोटात त्यांचा उजवा डोळा जायबंदी झाला होता. नंतरही त्यांचे बंदूकप्रेम कधी कमी झाले नाही. भालाफेकीत तर त्या काळात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता, असे माल्कमने गौरवाने नोंदवले आहेच. ते स्वत: उत्तम हिशेब तपासनीस होते, त्यामुळे महसूल-खंडणी वसुलीत कारकून त्यांची फसवणूक करण्याची शक्यता नसे. तोफांच्या कारखान्यात स्वत: तोफा ओतण्याचे कामही त्यांनी केले, यावरून त्यांची ध्येयावरची अथांग श्रद्धा सिद्ध होते.
आता प्रश्न असा उपस्थित राहतो की बाजीराव पेशव्यांनी दौलतराव िशदेंच्या एवढे कह्य़ात जाऊन यशवंतरावांचा एवढा दुस्वास का करावा? यशवंतरावांच्या उत्तरेतील पराक्रमाच्या वार्ता कानावर येत असता त्यांचा उपयोग दौलतीसाठी का केला नाही? हे महत्त्वाचे प्रश्न आहेत व या प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे. कारण पेशवाईच्या अस्तामागे पेशव्यांचे यशवंतरावांबाबतचे चुकलेले धोरण आहे, हे तर उघड आहे.
इतिहासावरून तीन गोष्टी ठळक होतात त्या अशा-
१. मल्हारराव होळकरांच्या निधनानंतर महादजी िशदेंचे प्रस्थ पुणे दरबारात वाढले. त्यांच्यानंतर आलेल्या दौलतरावाने तेच स्थान कायम ठेवण्याचा सर्वस्वी प्रयत्न केला. पेशव्याला आपल्या अंकित ठेवण्याचा सतत प्रयत्न केला, इतका की पेशवे िशदेंचे वर्चस्व झुगारण्यासाठी इंग्रजांच्या मदतीसाठी सन १८०० पासूनच प्रयत्न करत होते, पण तेव्हा ते ब्रिटिशांच्या अटी मानण्याच्या परिस्थितीत नव्हते. अहिल्याबाईंनी तुकोजीरावांना होळकरी राज्याचा सेनापती नेमले असले व विविध युद्धांत सेना घेऊन ते सामील होत असले, तरी ते अहिल्याबाई असेपर्यंत अधिकृत शासक नसल्याने राजकारणात पेशव्यांनी त्यांना सामील करून घेतले नाही. अहिल्याबाई व नंतर तुकोजीरावही गेल्यानंतर होळकरांचे राज्य बेवारस असून ते गिळता येईल असाच दौलतराव व बाजीराव पेशव्यांचा होरा होता. आणि ते शक्य केलेही. पण यशवंतराव एवढे पराक्रमी निघतील व जप्त केलेले होळकरी राज्य ते परत जिंकून घेतील याचा त्यांना अदमास आला नाही. तेथून त्यांचे सारेच आडाखे फसत गेले. दौलतरावाच्या सनिकी शक्तीवर बाजीरावाचा फाजील विश्वास होताच. पुढे यशवंतरावांनी तो आत्मविश्वास धुळीला मिळवला.
२. दुसरे असे की यशवंतरावांना पेशव्याने वा दौलतरावाने ‘औरस’ कधीच मानले नाही. अनौरसाकडे पाहण्याचा खास पेशवाई हिनत्वाचा दृष्टिकोन येथे आडवा आला व कसलीही माहिती नसताना त्यांनी यशवंतरावांना एक ‘बंडखोर’ अशीच उपाधी देऊन पेशवाईचा शेवटपर्यंत शत्रूच मानले. त्यामुळे बाजीरावाने यशवंतराव व िशद्यांत सलोखा घडवून आणण्याचा प्रयत्न केला नाही. िशद्यांनी तसा प्रयत्न फेटाळूनच लावला असता कारण ‘अनौरसाशी काय समझोता करायचा?’ या उद्दाम भावनेतच तो राहिला. पुढेही त्याने यशवंतरावांच्या ऐक्याच्या व इंग्रजांविरुद्धच्या लढय़ाच्या ज्या हाका दिल्या त्याला नीट प्रतिसाद का दिला नाही, याचे उत्तर याच खास तत्कालीन मराठी सनातनी वृत्तीत आहे.. भोसलेंबाबतही हेच म्हणता येईल. प्रत्यक्षात यशवंतरावांनी कोणाहीबाबत कटुता ठेवली नव्हती हे आपण पाहिलेच आहे.
३. पहिले बाजीराव हे जातीभेदातीत बुलंद व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे अनेक नवी लढवय्यी घराणी पुढे आली हे वास्तव आहे, पण पुढील पेशवाई ही मात्र फाजील वर्णाहंकाराची होती. पानिपतच्या युद्धकाळातील घडामोडींतच जातीयवादाच्या पाऊलखुणा उमटताना आपल्याला दिसतात. पानिपतच्या पराजयामागे हा छुपा जातीयवाद होता. पानिपतच्या युद्धात मसलतींत मल्हाररावांना डावलले जात होते. ब्राह्मण - मराठा- अन्यजातीय अशी त्रिभागणी उत्तर-पेशवाईच्या काळात झालेली दिसते. एका धनगराला मराठा राजमंडलात बरोबरीचे स्थान द्यावे काय, अशा सुप्त प्रवाहांच्या नोंदी आपल्याला इतिहासात सापडतात. त्यामुळे यशवंतरावांना न मोजण्याचे धोरण दुसऱ्या बाजीरावाने कायम ठेवले असे दिसते. ‘इंग्रजांच्या वर्चस्वाखाली जाणे श्रेयस्कर, पण यशवंतराव होळकरांच्या नको..’ असा निर्णय दुसऱ्या बाजीरावाने घेतला असेल तर त्याची जातीय मनोभूमिका आपण समजावून घेऊ शकतो. पण त्याचे दूरगामी परिणाम काय होतील, याचा कसलाही विचार पेशव्याने केला नाही हे दुर्दैवी आहे. त्याने यशवंतरावांच्या आवाहनांना प्रतिसाद देऊन परत पुण्याला यायला हवे होते.. पण तसे झालेले नाही.
१७९७ ते १८११ असा फक्त चौदा वर्षांचा काळ यशवंतरावांच्या कर्तृत्वासाठी मिळाला. १७९७ ते १८०३ हा काळ यशवंतरावांना स्वत:चे राज्य व अधिकार प्रतिष्ठापित करण्यासाठी, स्वत:ची पत्नी व कन्येस कैदेतून मुक्त करण्यासाठी वेचावी लागली. १८०३ पासून त्यांनी इंग्रजांविरुद्ध र्सवकष अथक लढा उभारला आणि बलाढय़ इंग्रज सेनांना एकामागून एक वेळा पराजित केले. यशवंतरावांना जिंकता येत नाही म्हणून वेलस्लीसारख्या गवर्नर जनरलची हकालपट्टी इंग्रज सरकारला करावी लागली. भारताबाबतची धोरणे बदलावी लागली. जगात अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रज सेनेची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगली गेली. एवढे झंझावाती, दुर्दैवाच्या आघातांनी भरलेले त्यांचे जीवन. पण त्यांचा अजरामर आशावाद कधीच निस्तेज झाला नाही. कलकत्त्यावर आक्रमण करून एकटय़ाच्या जिवावर भारत स्वतंत्र करण्याची त्यांची उमेद अखेरच्या क्षणापर्यंत अभंग होती. मला वाटते कोणत्याही महाकवीला स्फूर्ती देईल असेच हे वादळी जीवन होते. असा महामानव आपल्या धर्तीवर जन्माला आला हे आपले भाग्यच आहे. आपण त्यांना समजून घेतले नाही, हे आपले दुर्भाग्य आहे.
जेम्स व्हीलर नावाचा पाश्चात्य इतिहासकार यशवंतरावांबद्दल लिहितो-
" The life of Yashwant Rao Holkar was one of unceasing struggle and peril, endured with the abounding high spirits for which he was renowned. He experienced the murder of one brother by Sindhia and the public execution of another by the Peshwa. He took lightly even the loss of an eye by the bursting of a matchlock; jesting at the belief that a one-eyed man is wicked, he exclaimed that he had been bad enough before but would now surely be the guru or high priest of roguery. He was generous as well as witty, and his wildness was pardoned as part of the eccentricity of genius. He was of superior education as well as superior mental abilities, a skilled accountant and literate in Persian as well as Marathi.
" No member of his race ever possessed the gift of guerilla warfare in such higher measures as did Yashwant Rao Holkar. His resources were always slight, but his energy and hopefulness boundless. When for the war that now followed he announced to his troopers that they must gather their own rewards and these conditions were accepted with enthusiasm. His reputation was such that, even when himself a fugitive from Scindiaks army, he had been continually strengthened by desertions from his pursuer. His personal courage was of the kind which soldiers most esteem, that of such leaders as Ney and Lannes, and he never lost his personal ascendancy until he lost his reason. "
खरे यशवंतराव या पुस्तकामुळे कळायला मदत झाली असेल.. आता तरी त्यांच्या वीरश्रीचे, स्वातंत्र्यप्रेमाचे पवाडे मुक्तकंठाने गाल आणि भारतभूमीच्या या सुपुत्राची नित्य आठवण ठेवाल अशी आशा आहे.

Friday 13 July 2012

पेशव्यांचे सरदार होळकर?

 या ब्लॉगची निर्मिती करण्याचा मुख्य हेतू हा होळकरांचा पराक्रमी इतिहास जगासमोर आणणे आहे जो कि जातीयवाद्याच्या कारणाने अथवा अन्य कारणाने आतापर्यंत लपवून ठेवण्यात वा विकृत करण्यात आला होता.
  होळकरांची ओळख हि सहसा पेशव्याचे सरदार म्हणूनच नोंद आपल्याला इतिहासात पाहायला मिळाली आहे. पण तसे  पाहायला गेले तर मल्हाररावानंतर कुणालाही पेशव्यांकडून सभेदारकिचे वस्त्रे देण्यात आली नाहीत. त्यामुळे होळकरांना पेशव्यांचे सरदार म्हणणे तांत्रिकद्ष्ट्या चुकीचे ठरते.

  ज्या प्रमाणे आदिलशाहीच्या सरदारकीपासून अलिप्त होऊन भोसलेनी स्वताचे वेगळे राज्य निर्माण केले, ज्या प्रमाणे पेशव्यांनी भोसलेंना कमजोर बनवून स्वत राज्याचे मालक बनले अगदी त्याच प्रमाणे होळकरहि पेशव्यांपासून अलिप्त झाले होते आणि स्वताचे वेगळे राज्य चालवत होते आणि त्याचबरोबर स्वताची वैयक्तिक राजमुद्रा निर्माण केली व चलने जारी केले. जे कि शिंदे, गायकवाड व पवार करू शकत नव्हते.

  पेशव्यांविरुद्धचे होळकर राजकारण नेमके केंव्हा सुरु झाले?
 खंडेराव होळकर यांचे इ.स. १७५४ मध्ये, कुम्हेरच्या सुरजमल जाटच्या विरुद्धच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यानंतर मल्हाररावाला सुरजमल जाटच्या विरोधात मदत करण्याऐवजी जाटचे रक्षण करणाऱ्या स्वार्थी शिंदेमार्फत पेशव्यांनी ६० लक्षाची खंडणी गोळा करून शिंदेना पाटीशी घातले. या क्षणापासूनच मल्हारराव होळकरांच्या पेशव्यांविरुद्धच्या राजकारणाला आरंभ झाला असे मानण्यास हरकत नाही.
  त्यानंतर अश्या अनेक गोष्टी होळकरांनी केल्या ज्या पेशव्यांच्या विरोधात होत्या. उदा. मल्हाररावांचे १७५८ सालचे "धोतर बडवे" पत्र,  आहिल्याबाईनी १७६७ साली पेशव्यांना घ्यायला लावलेली माघार असो वा १८०२ सालचे यशवंतरावचे हडपसरचे युद्ध व त्यात पेशव्यांचा अपमानास्पद पराभव. 
 
 ज्या प्रमाणे भोसलेना छत्रपती, पेशवेना श्रीमंत हि पदवी होती अगदी त्या प्रमाणे होळकराना सुद्धा महाराजा हि पदवी होती. माझ्या मते मराठेशाहीच्या इतिहासाचे तीन कालखंड आहेत. भोसलेकालीन इतिहास, पेशवेकालीन इतिहास व होळकरकालीन इतिहास...

- सचिन शेंडगे (९८६०३२४३८४)