Tuesday, 4 September 2012

होळकरकालीन चांदवडचा रंगमहाल

- सुदर्शन कुलथे

नाशिकला ऐतिहासिक वारसा भरपूर लाभलाय. इतिहासातल्या कुठल्यान् कुठल्या गोष्टीशी नाशिकचे धागेदोरे जुळतात. त्यामुळेच आजही नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात अनेक प्राचीन लेणी , मंदिरं आणि ऐतिहासिक वास्तू दिसून येतात. असाच होळकरकालीन कलेचा एक सुंदर अविष्कार म्हणजे चांदवडचा रंगमहाल...

.............

चांदवड हे गावच मुळी ऐतिहासिक. शनिमहात्म्यात तामलिंदापूर , चैत्रमहात्म्यात चंदवड , जैन साहित्यात चंददिव्यपूरी तर यादवांच्या काळातलं चांदोर अशी निरनिराळ्या काळातली आताच्या चांदवडची नावं सापडतात. गिर्यारोहक मंडळींचा चांदवडच्या प्रदेशात नेहमीच चक्कर असतो. कारण , या भागाच्या सातमाळा पर्वतराजीतले तालेवार गड-किल्ले नेहमीच त्यांना खुणावत असतात. घाटात असणाऱ्या रेणुकादेवीच्या दर्शनालाही बऱ्याचदा जाणं होतं. पण चांदवडला आत गावात जाऊन तिथल्या ऐतिहासिक वास्तू पाहण्याचं राहूनच गेलेलं असतं. चांदवडला कसं जायचं हे काही वेगळं सांगायला नको. काळाच्या ओघात काही जुने वाडे , वेशी आणि तटबंदी पडून गाव विस्तारलेलं असलं तरीही आज दोन-तीन वेशी आपल्याला बघायला मिळतात. चांदवड गाव पूवीर् सात वेशींमध्ये बांधलेलं होतं. दिल्ली दरवाजा , धोडंबे (धोडप) दरवाजा , बाजार वेस , जुनी सरकारी वेस , आनकाई वेस , ढोलकीची वेस (शिवाजी चौकातली) , गुजरात गल्ली वेस अशा वेशींपैकी काही आज पाहावयास मिळतात तर काहींना वाढत्या गावाने फोडून टाकलं आहे. एसटी स्टॅण्ड कडून गावात जातांना आठवडे बाजार वेस आपलं स्वागत करते. या वेशीवर जरी हल्ली फ्लेक्स बोर्ड झळकत असले तरी मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूंना पूवीर्चे शिलालेख आढळतात. एक मराठीतला तर दूसरा फारसी भाषेत कोरलेला आहे. मराठीतला शिलालेख थोडं बारकाईने बघितला तर वाचता येतो. इथूनच चांदवड आपल्याला त्याच्या प्राचीनत्त्वाची प्रचिती देतं. गावात काही प्रसिद्घ आणि शिल्पकलेचे अद्वितीय नमुने असलेले साखळीवाडा , तटेर्वाडा , गोखलेवाडा , वैद्यवाडा असे जुने वाडेही होते , असं म्हणावं लागतं. कारण तेही पोखरून नेस्तनाबूत झालेत.
या सर्वात आजही आपलं अनोखं सौंदर्य घेऊन उभा आहे तो म्हणजे रंगमहाल. गावातल्या बच्चालाही विचारलं रंगमहाल कुणीकडे , तरीही लगेच तो बोट करून रस्ता दाखवतो. आजुबाजूला दोन भव्य बुरुज , तटबंदी आणि मध्यभागी उंच असं दगडी प्रवेशद्वार. रंगमहाल इतका मोठा अगदी जवळजवळ पुण्याच्या शनिवार वाड्याएवढा असेल याची आपल्याला कल्पनाही नसते. उत्तरेकडे तोंड असलेल्या प्रवेशद्वाराची कोरीव कमान , छोट्या खिडक्या , आत पहारेदाराच्या खोल्या आणि वर अंबारीसारखे घुमट असलेली तटबंदी असा रंगमहालाचा रुबाबदार थाट दिसतो. प्रवेशद्वाराचा लाकडी दरवाजा आजही शाबूत असून तोही वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने घडविलेला दिसतो. परकीय आक्रमण झाल्यास दरवाजा हत्तीच्या धडकेने तोडला जाऊ नये म्हणून त्यावर लांब व टोकदार असे लोखंडी खिळे बसविलेले दिसतात. दरवाजाच्या भव्यतेवरून आतल्या रंगमहालाचा पसारा किती असावा याचा अंदाज येतो. आत प्रवेशताच समोर मुख्य महाल नजरेत पडतो. इथं बऱ्यापैकी लोकांची वर्दळ दिसून येते. ही वर्दळ रंगमहाल बघण्यासाठी नाही तर ह्यात चालणाऱ्या पोस्ट ऑफिस , ग्रामीण कार्यालयं व कोर्टकचेरीच्या कामांसाठी आलेल्यांची असते. रंगमहालासारख्या वास्तूचा वापर सरकारच्या सार्वजनिक कामासाठी होतोय हे बघून कलेचा पुरातन वारसा जतन व्हावा अशी प्रामाणिक इच्छा असणाऱ्या कलाकाराला निश्चितच दु:ख होतं. पण तरीही आज इतक्या सुस्थितीत असलेला महाल बघून आनंदही होतो.

मुख्य इमारतीत आत गेल्यावर लाकडाचे भव्य खांब त्यावरील नक्षीकाम , गोलाकार कमानी , बारीक कलाकुसरीची वेलबुट्टी , लाकडाला कोरून केलेल्या जाळीच्या भिंती असं किती बघावं नि किती नाही असं होतं. आत गेल्यावर आपण महालातच्या मध्यभागी असलेल्या मोकळ्या चौकात येऊन पोहोचतो. हा जवळपास ६० बाय ६५ फूट एवढा चौक असून त्याच्या अवतीभोवती नजर फिरविल्यास लाकडावर किती बारीक आणि देखणं नक्षीकाम होऊ शकतं याचा प्रत्यय येतो. खुल्या चौकाच्या चारही बाजूंना वेगवेगळी दालनं , त्या दालनांचे लाकडी खांब आणि त्या खांबांच्या वरच्या भागावर काष्ठशिल्प , आडव्या तुळईंवरच्या बारीक वेलबुट्टी आणि असे कोरीव लाकडी खांबांचे एकावर एक तीन मजले असा हा भव्यदिव्य सेटच उभारलेला आहे. या काष्ठशिल्पात आपल्याला अनेक वेगवेगळी फुलं , पोपट , मोर इ. पक्षी तसंच हत्ती , सिंह , वानर अशा अनेक प्राण्यांच्या कलात्मक प्रतिमा कोरलेल्या दिसतात. रंगमहालाच्या भिंतीही जुन्या विटांच्या आणि दगडी बनावटीच्या भक्कम अशा बनविलेल्या आहेत. संपूर्ण बांधकाम चुन्यात केलेलं आहे. या मध्यभागाच्या चौकात आपण या सर्व कलात्मकतेत हरवूनच जातो. इथं दर्शनी भागातल्या एका दालनात होळकरांची राजगादी ठेवलेली असून होळकर वंशीयांचे जुने फोटोही लावलेले आहेत. हल्लीच इथं अहिल्यादेवींची छोटी मूतीर् बसवून त्यासमोर कारंजा बसवून थोडं सुशोभिकरणही केलेलं आहे. रंगमहालाच्या वरच्या भागात जाण्यासाठी जिने आहेत. इथं वर कोर्टाचं कामकाज चालतं. सगळी दालनं कागदंपत्रांनी भरलेली असून वकील , लिपिक , एजंट आणि लोकांची बरीचशी गदीर् या कलात्मक महालात निरस चेहेऱ्याने वावरत असलेली दिसते.
या वरच्या भागाच्या छतावर फारच सुंदर असं रंगकाम केलेलं आहे. लाकडी फळ्यांवरची त्या काळातली पेंटींग्जही अतिशय देखणी आहेत. काही दालनांमध्ये फिरलं तर इथं बरीचशी भित्तीचित्रंही दिसतात. त्यात निसर्ग , प्राणी , पशुपक्षी , यांच्यासोबतच तात्कालिन महिला , पुरुष , त्यांची वेशभूषा इत्यादी बाबी चित्रांकीत केलेल्या दिसतात. आजही इथली चित्रं सुस्थितीत आहेत. यावरून आपल्याला त्या रंगांच्या टिकाऊपणाची कल्पना येते. अजिंठ्याची भित्तीचित्रं जशी जगभरात प्रसिद्घ आहे त्याच प्रकारच्या टेम्प्रा टेक्निकने इथली चित्रं चितारलेली आहेत. होळकरांच्या इंदोरलाही अशी चित्रं बघायला मिळतात. पण त्यापेक्षाही चांदवडची ही चित्र जुनी आहेत. सन १९२१ मध्ये सुप्रसिद्घ पुरातत्त्व तज्ज्ञ आर. आर. बॅनजीर् यांनी चांदवडच्या रंगमहालातली ही चित्रं अवलोकन केली. त्यानंतर १९३३ मध्ये नाशिक जिल्ह्याचे तात्कालिन न्यायाधिश एच. एफ. नाईट यांनी ही चित्र पाहून जे. जे. स्कुल ऑफ आर्टचे त्यावेळचे संचालक एच. जे. किंग यांना त्याच्या अभ्यासासाठी आमंत्रित केलं. तेव्हा किंग यांनी ही भित्तीचित्रं बघून आश्चर्य प्रकट केलं आणि या चित्रांचा अहवाल तयार करून होळकरांना पाठविला. होळकरांनी तिथल्या कलागुरु देवळालीकर यांना या चित्रांच्या वगीर्कृत अभ्यासासाठी पाठवलं आणि त्यानंतर १० वर्षांनी म्हणजे १९४४ मध्ये ही भित्तीचित्रं संरक्षित झाली. अशा ह्या चित्रांमधल्या रामायण , महाभारतासोबतच अनेक पौराणिक आख्यानं आणि कृष्णलीला बघण्यात आपण हरवून जातो. नाशिक जिल्ह्यात इतकी चांगली प्राचीन चित्रं बघायला मिळतात याचा अभिमानही वाटतो. रंगमहाल हा शब्द ऐकला म्हणजे राजामहाराजांचं हे अय्याशीचं ठिकाण असावं असं वाटतं. कारण जिथं नतिर्का नाचतात वगैरे गोष्टी म्हणजे रंगमहाल असं वाटतं. पण इथं आल्यावर कळतं की इथल्या या अनोखी चित्रकला असलेल्या रंगकामामुळे रंगमहाल नाव पडलेलं आहे.

रंगमहालाच्या सर्वात वरच्या भागावर तटबंदी असून दोन अंबारीसारख्या उंच अशा खोल्या बनविलेल्या दिसतात. देखरेखी बरोबरच नगारा किंवा तुतारी वाजविण्यासाठीचे हे उंच मिनारासारखं दालन असावं. सर्वात खाली तळघर असून यातून एक भुयारी मार्ग थेट रेणुका देवीच्या मंदिरात गेलेला आहे. पण सध्या हा बंद करून ठेवलाय. अजून एक दिव्य वास्तू प्रकार रंगमहालात बघायला मिळतो. तो म्हणे इथं असलेली भली मोठी विहीर. ही एक प्रचंड मोठी पायऱ्यांची बारव असून त्यात चारही बाजूने खाली पाण्यापर्यंत उतरण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत. ही विहीर इतकी मोठी आहे की आत एकाच वेळी पाचपन्नास लोक उतरू शकतात. उतरणाऱ्या जिन्याला अनेक कमानींचे दरवाजेही आहेत. तसेच कपडे बदलण्याची किंवा इतर वापरासाठी विविध खोल्याही त्यात केलेल्या आहेत. एवढी भव्य विहीर नाशिक जिल्ह्यात क्वचितच कुठे बघावयास मिळेल! यात बाराही महिने पाणी तुडूंब भरलेलं असतं.

असा हा रंगमहाल कितीही बघितला तरी दरवेळी नवनव्या गोष्टी दाखवतच जातो. चित्रकार , वास्तुकार , इतिहासतज्ज्ञ , शिल्पकार , संशोधक असं कुणीही आलं तरीही रंगमहाल त्यांना काही ना काही अद्भुत देतोच. कितीही वेळ बघितला तरी वाटतंच राहतं , ' नका सोडून जाऊ रंगमहाल.... '
 

Saturday, 11 August 2012

सर्वश्रेष्ठ प्रशासक - महाराणी अहिल्याबाई होळकर


सर्वश्रेष्ठ प्रशासक
-प्रा. हरी नरके,
कृषीवल, रविवार मोहोर, 3 जून 2012
महाराष्ट्राने आधुनिक काळात देशाला अनेक उत्तम प्रशासक दिले आहेत. ही परंपरा आपण इतिहासातून घेतलेली आहे. अठराव्या शतकातील सर्वश्रेष्ठ प्रशासक म्हणून गौरविल्या गेलेल्या अहिल्याबाई होळकर यांची आपण गेल्या गुरूवारी 287वी जयंती साजरी केली. इंग्रज इतिहासकारांनी अहिल्याबाई होळकर या संपूर्ण भारतातील 18व्या शतकातील सर्वश्रेष्ठ प्रशासक होत्या, असे सार्थ वर्णन केले आहे.
होळकर घराणे मूळचे फलटणजवळच्या होळ गावचे, म्हणून ते होळकर.  या घराण्यातील आद्य थोर योद्धे मल्हारराव होळकर यांचा जन्म सन 1693च्या मार्चमध्ये झाला. मराठा राज्यामध्ये त्यांचा विशेष दरारा होता. मल्हारराव हे धूर्त मुत्सद्दी राजकारणी होते. भाऊसाहेबांची बखर या ग्रंथात त्यांच्या चरित्रातील एक मार्मिक प्रसंग वर्णिलेला आहे. पेशव्यांनी शिंद्यांना तातडीचा खलिता पाठवला, ज्यात होळकरांना सोबतीला घेऊन रोहिल्यांना खतम करण्याचा आदेश दिला होता. शिंदे मल्हाररावांना भेटले आणि त्यांनी तातडीने युद्धभूमीवर येण्यासाठी विनंती केली. मल्हारराव त्यांना म्हणाले, शिंदे, तुम्हाला राजकारण कळत नाही. रोहिले मेले तर, पुण्याचे पेशवे तुम्हा-आम्हांस धोतरे बडवावयास भांडी घासावयास ठेवतील. लक्षात ठेवा, शत्रू जिवंत आहे, तोवरच धन्याला तुमची-आमची किंमत आहे.
सन 1723मध्ये मल्हाररावांना खंडेराव हा मुलगा झाला. चौंडी गावचे माणकोजी शिंदे यांचे पोटी 31 मे 1725 रोजी अहिल्याबाईंचा जन्म झाला. वयाच्या आठव्या वर्षी त्यांचे खंडेरावांशी लग्न झाले आणि त्या मल्हाररावांच्या सून बनल्या. 17 मार्च 1754 रोजी कुंभेरीच्या लढाईत खंडेरावांचा मृत्यू झाला. अहिल्याबाई विधवा झाल्या. खंडेरावांच्या मृत्यूनंतर मल्हाररावांनी सूनेलाच मुलगा मानले. त्या मल्हाररावांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाल्या. अहिल्याबाईंना मालेराव आणि मुक्ताबाई ही दोन मुले होती. मल्हारराव आणि अहिल्याबाई, हे नाते सासरा-सुनेचे असले तरी ते तिहेरी होते. 1) गुरू-शिष्य, 2) बाप-लेक, 3) स्वामी-सेवक.
लढवय्ये मल्हारराव 20 मे 1766 रोजी मृत्यू पावले. त्यानंतर राज्यकारभाराची सगळी सूत्रे अहिल्याबाईंकडे आली. त्यानंतर पुढे सुमारे 30 वर्षे अहिल्याबाईंनी राज्यकारभार केला. इंदूर ही मल्हाररावांची राजधानी होती. अहिल्याबाईंनी मात्र ती तेथून नर्मदाकाठच्या महेश्वरला हलविली.
अहिल्याबाई- द्रष्ट्या प्रशासक :
अहिल्याबाईंची प्रतिज्ञा होती की, माझे कार्य माझ्या प्रजेला सुखी करणे हे आहे. माझ्या प्रत्येक कृतीला मी स्वतः जबाबदार आहे. सत्तेच्या अधिकारामुळे येथे मी जे जे काही करीत आहे, त्या प्रत्येक कृत्याचा जाब परमेश्वर मला विचारणार आहे. परमेश्वराने ज्या जबाबदाऱ्या माझ्यावर सोपविल्या आहेत, त्या साऱ्या मला पार पाडावयाच्या आहेत.
अहिल्याबाईंचा प्रत्येक लहानसहान व्यवहारही प्रजेचे हित बघून होत होता. त्याचे शेकडो कागदोपत्री पुरावे आज उपलब्ध आहेत. आपला प्रदेश मक्त्याने देताना त्या पुढीलप्रमाणे अटी घालत असत. 1) रयत राजी राखणे 2) राज्य समृद्ध करणे 3) नेमणुकी खर्चाच्या मर्यादेतच खर्च करणे 4) लष्कराने पायमल्ली केल्यास कठोर दंड केला जाईल. 5) अफरातफर झाल्यास कडक शिक्षा केली जाईल.
अहिल्याबाई स्वतः न्यायनिवाडे करीत. प्रश्न सोडवित. पडीक जमिनी लागवडीखाली आणीत. शेतात विहीरी खोदून देत. सरकारी हिशोब स्वतः तपासून एकेक खाते सोलून बघत. अहिल्याबाईंनी प्रत्येक विभागाची आणि शाखेची नव्याने रचना केली. शेतसारा आणि करवसुलीची पद्धत बदलली. नवी घडी बसविली. नवे कायदे केले. त्या शेतकऱ्यांना वार्षिक 12 टक्के दराने शेतीसाठी कर्ज देत. व्यापार, वाहतूक, उद्योग वाढीला प्रोत्साहन देत. त्यामुळे महेश्वर हे विणकरांचे अखिल भारतीय केंद्र बनले. व्यापार आणि उद्योगाचे सुप्रसिद्ध ठिकाण बनले.
प्रजाहितदक्षतेची उदाहरणे :
महेश्वरच्या रयतेकडून राघोबादादा पेशव्यांनी एकदा आठ बैल नेले. अहिल्याबाईंना हे कळताच त्यांनी त्या रयतेला प्रत्येकी आठ रुपये या प्रमाणे 64 रुपये स्वतःच्या तिजोरीतून भरपाई दिली.
कल्लू हवालदार या शिपायाची मोठी रक्कम भिकनगावी चोरी गेली होती. इतक्या छोट्या गोष्टीतही त्यांनी स्वतः लक्ष घातले आणि कल्लू हवालदाराला न्याय मिळवून दिला.
चांदवडच्या मामलेदाराने रयतेला त्रास दिल्याची अहिल्याबाईंकडे तक्रार आली. त्यांनी मामलेदाराला कडक शब्दांत ताकीद दिली. कै. सुभेदार रयतेचे उत्तम संगोपन करीत होते. रयतेला तुम्ही कोणत्याही प्रकारे त्रास देता कामा नये. त्यांची मने सांभाळून त्यांच्याकडे लक्ष देणे. फिरून जर बोभाट कानावर आला तर, परिणाम फार वाईट होतील, हे समजावे. यावरुन, वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही प्रसंगी फटकारण्याची त्यांची वृत्ती स्पष्ट व्हावी. राज्यकर्त्या म्हणून अहिल्याबाई यशस्वी होत्या. पेशव्यांच्या दरबारात त्यांना सर्वोच्च मान होता. बाईंचा सगळ्या कारभाऱ्यांवर वचक होता. प्रशासनावर घट्ट मांड होती.  
मकाजी गीते हे मराठ्यांचे मेवाडमधील वसुली अधिकारी होते. तेथील जनता त्यांना वसूल द्यायला तयार नव्हती. जनतेने लेखी मागणी केली की, दख्खन्यांमध्ये आम्ही फक्त मातोश्री अहिल्याबाईंच्या शब्दांवर विश्वास ठेवतो. त्यांच्याकडून आम्हाला पत्र आल्यास आम्ही तुमचा भरवसा धरू.
ग्रंथप्रेमी :
अहिल्याबाई स्वतः ग्रंथप्रेमी होत्या. त्यांनी त्याकाळात स्वतःचे फार मोठे दर्जेदार ग्रंथालय उभे केले होते. त्यात शेकडो ग्रंथ आणि पोथ्या जमवल्या होत्या. विशेष म्हणजे दररोज रयतेसोबत स्वतः बसून त्या जाणकारांकडून सामूहिक ग्रंथवाचन करून घेत.
अहिल्याबाई मुत्सद्दी होत्या. अष्टावधानी होत्या. त्यांनी आपले वकील भारतभर नेमले होते. त्यामुळे प्रत्येक राज्यातल्या बातम्या त्यांना तात्काळ कळत असत आणि त्यानुसार त्या आपल्या राजकारणाची दिशा ठरवत असत.
त्यांच्या दानधर्माची कीर्ती देशभर पसरली होती. त्यांनी हिमालयाच्या केदारनाथपासून दक्षिणेच्या रामेश्वरपर्यंत आणि जगन्नाथ पुरी ते द्वारकेपर्यंत मंदिरे, घाट, धर्मशाळा, अन्नछत्रे, पाणपोया उभारल्या.
बाईंनी खांद्यावर पेललेली होळकरशाही हा मराठा साम्राज्याचा मोठा आधारस्तंभ होता. सन 1780 साली त्यांचे भारतातील स्थान इतके वरचे होते की, दिल्लीचे पातशहा त्यांना वचकून असल्याचे अस्सल पत्रांवरुन दिसते.
पाश्चात्य इतिहासकार लॉरेन्स याने अहिल्याबाईंची तुलना अकबराशी केली असून, इंग्लंडची राणी एलिझाबेथ, रशियाची राणी कॅथरिन आणि डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्यापेक्षा त्या अनेक सद्गुणांनी श्रेष्ठ होत्या, असे म्हटले आहे.
अहिल्याबाई उत्तम हिंदी बोलत आणि लिहीत. एका पत्रात त्या म्हणतात, अठाका समाचार भला छे। राज का सदा भला चाहिजे। कोई तरह की दिक्कत होने पावे नहीं।
पेशव्यांनीही होळकरांच्या कारभाराची स्तुती केल्याचे आढळते. मातब्बर सरदार मोठे दाबाचे होते. शिंद्यांची तो सरदारी मोडीस आली. होळकर तिकडे होते, तेणे करून राज्यात वचक होता.हे पेशव्यांचे प्रमाणपत्र ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे.
समकालीन त्यानंतरच्या काळात देशविदेशांतील अनेक कवी, साहित्यकारांनी अहिल्याबाईंचा गुणगौरव केल्याचे दिसते.
शाहीर प्रभाकर म्हणतात,
धन्य धन्य अहिल्याबाई।
गेली कीर्ती करूनिया, भूमंडळाचे ठायी॥
महाराज अहिल्याबाई, पुण्यप्राणी।
संपूर्ण स्त्रियांमध्ये श्रेष्ठ रत्नखाणी॥
संसार चालवी दीनदुबळ्यांची आई।
जेविल्या सर्व, मगच आपण अन्न खाई॥
बांधिले घाट-मठ-पार। कुठे वनात पाणी गार॥
हिंदी कवी श्रीधर चौबे यांनी सन 1789मध्ये लिहिले होते की,
यावतचंद्रदिवाकर गंगाजल बहाई।
धनी धन्य अहिल्यामाई।
ध्रुव कैसो, अटल राज रहे।
प्रजा परिजन सुहाई॥
इंग्रज कवयित्री जोना बेली यांनी सन 1849मध्ये अहिल्याबाईंचा गौरव करताना म्हटले होते-
For Thirty years her reign of peace,
The land in blessing did increase,
And she was blessed by every tongue,
By stern and gentle, old and young,
Yea, even children children at their mother’s feet,
Are tought such homely rhyming to repeat,
Kind was her heart and tright her fame,
And Ahlya was her honoured name.”
अबराय मॅके हा प्रसिद्ध इंग्रज ग्रंथकार म्हणतो की, त्यांचे वर्णन वर्डस्वर्थच्या पुढील शब्दांत करता येईल.
A Perfect Woman, nobly planned to warm,
To comfort and command,
And yet a spirit still and bright
With something of an angel light.”
मराठीतील ख्यातनाम कवी माधव ज्युलियन यांनी पुढील शब्दांत अहिल्याबाईंचा गौरव केला आहे.
रहस्य दावी इतिहासाची कथा अहिल्याराणीची,
कांचनगंगा वाहवुनी, जी उभवी यशाचा धवलगिरी,
होळकर कुलप्रभा, कोण हो तत्स्मृतीला धरील शिरी
ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांनी म्हटले होते की,
राजयोगिनी सती अहिल्या होळकरांची राणी,
अजुनि नर्मदा जळी, लहरती तिच्या यशाची गाणी.”
यावरुन अहिल्याबाई या थोर मुत्सद्दी, धोरणी राजकारणी, द्रष्ट्या प्रशासक, समाजहितैषि, अखिल भारतीय स्तरावर स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा लौकिक आणि दरारा प्रस्थापित करणाऱ्या महान राज्यकर्त्या होत्या, हे स्पष्ट होते. या लोकमातेचा मृत्यू 13 ऑगस्ट 1795 रोजी झाला. ‘पुण्यश्लोकअसे सार्थ बिरुद 1907 सालापासून त्यांच्या नावामागे लावले जाऊ लागले असले तरी सर्वश्रेष्ठ प्रशासक ही अहिल्याबाईंची मोहोर आज आपल्या देशाला अधिक प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.