वाफगावचा भुईकोट किल्ला व यशवंतराव होळकरांची साजरी केलेली पहिली जयंती..
|
|
किल्याचा मुख्य
प्रवेश द्वार
|
३ डिसेंबर हा दिवस भारतीय क्रांतीचे आध्य प्रणेते महाराजा यशवंतराव होळकर
यांचा जन्मदिवस. ३ डिसेंबर १७७६ मध्ये महाराष्ट्राच्या पुण्य भूमीत गाव- वाफगाव, ता. खेड जि. पुणे येथे होळकरांच्या घरी एक तेजस्वी पुत्र
जन्मास आला. ज्यानी पुढे अनेक युद्ध लढले, इंग्रजाना सळो कि
पळी करुन सोडले. दक्षिणेपासून थेट पंजाब पर्यंत ज्याचा राज्यविस्तार होता. त्याच
बरोबर पंजाब ते बंगाल अशी अजस्त्र दौड मारणारा, प्रत्येक
युद्धात विजयी खेचून आणणारा, इंग्रजासारख्या अत्यंत बलाढ्य
नि शिस्तबद्ध सेनेची घुळधाण उडविणार आणि एकूण १८ पैकी १८ लढायांमध्ये शत्रूला
लोखंडी चणे चारणारा हा वीरपूत्र म्हणजे महाराजा यशवंतराव होळकर. पेशवाईच्या काळात
पुण्यात बसून ऐशोराम कारणा-या पेशव्याना उत्तरेकडून येणा-या शत्रूला थेट पुण्यावर
हल्ला करता येऊन नये वा शत्रूला मध्ये कुठेतरी मध्यभारतात थोपवून धरण्यासाठी एक
अत्यंत वीर सरदाराची गरज होती. ही जबाबदारी मल्हारबा होळकर यांच्यावर पडली.
मल्हारबानी शेवटच्या क्षण्यापर्यंत पेशव्यांच्या संरक्षणार्थ उत्तरेतील वाटेत
होळकरी सेनेची पोलादी भींत उभारून पुण्याच्या दिशेनी येणारा प्रत्येक हमला परतवून
लावला. त्यांच्या हयातीत पुण्यास मोठा आरामा लाभला, याचा
परिणाम भलताच झाला, असो.
यशवंतरावानी केलेल्या लढाया, इंग्रजाचे
पारिपत्य, पुण्यावरील चढाई, ते पंजाब
पर्यंतची यशस्वी दौड हे सर्व सोनवणींच्या पुस्तकातून मांडण्यात आलेले आहे
त्यामूळे मी त्यावर भाष्य करणार नाही. ज्याना अधिक माहिती हवी असेल त्यानी
सोनवणींचे पुस्तक वाचावे.
३ डिसेंबर हा वर उल्लेखित महान राजाचा जन्मदिवस. महाराजा यशंवतराव होळकरांचा
जन्म वाफवागचा. तिथे त्यांच्या पुर्वजाचा वाडा आहे असे आम्हाला कळले. खाडे
साहेबानी या वर्षीची जयंती वाफगावात जाऊन साजरी करण्याचा संकल्प सोडला. त्यानी महादेव जानकर साहेबांशी चर्चा करुन कुठल्याही
परिस्थीतीत जयंती करायचीच हे पक्क केलं. त्यानंतर राष्ट्रिय समाज पक्षाच्या
कार्यकर्त्यानी पुढाकार घेऊन जयंतीची तय्यारी सुरु केली. हा हा म्हणता ३ डिसेंबर
उगवला. सकाळी आठलाच मी संजय साहेबांच्या घरी थडकलो. तिथून लगेच आम्ही करिश्मा
चौकात पोहचलो. सकाळी नऊ साडेनऊच्या दरम्यान करिश्मा चौकात यशवंतराव होळकरांची
जयंती साजरी करण्यात आली. ज्या पुण्यात त्यांच्यावर लुटारु म्हणून दोषारोप
ठेवण्यात आले त्या पुण्यात मागच्या २३५ वर्षातील ही पहिली वहिली जयंती करण्याचे
धाडस आम्ही केले. आज पर्यंत ईथल्या पुरोगामी म्हणवुन घेणा-या अभ्यासकानी व इतिहासकारानी
त्यांचा सातत्याने केलेला तेजोभंग आम्ही जयंती साजरी करुन पिटाळून लावला. त्या
नंतर लगेचच आम्ही यशवंतरावांच्या जन्मगावी, म्हणजेच वाफगावला
जयंती साजरी करण्यासाठी निघालो.
वाडा नव्हे, तो किल्ला आहे किल्ला...
|
|
महालाचे दुरुन
घेतलेले फोटो
|
आज पर्यंतच्या इतिहासातील संदर्भ वाचून आम्हाला हेच माहित होते की वाफगावला
होळकरांचा वाडा आहे. म्हणून आम्ही जाताना वाडा असेल असेच डोक्यात ठेवून गेलो.
राजगुरु नगर पासून उजविकडे वळल्यावर १२ कि.मी. अंतरावर वाफगाव आहे. आमची गाडी
वाफगावात शिरली, पण तिथे जयंतीचा ना उत्साह दिसला, ना लोकांची गर्दी होती किंबहुना आज यशवंतरावाची जयंती आहे हे सुद्धा
तिथल्या स्थानिकाना माहीत नव्हते. आमचे रासपचे कार्यकर्ते तेवढे जयंतीची
तय्यारी करत होते पण गावक-याना मात्र काही देणघेणं नव्हतं. आम्ही एक होटेलात
नाश्ता करायला गेलो तर तिथली म्हाणसं मोठ्या कुतूहलानं चौकशी करत होती की ’कुठल्या सिनेमाची शुटिंग आहे?, होरो कोण आहे?’
वगैरे. मी जेंव्हा त्या स्थानिकाना सांगितलं की अरे आम्ही
सिनेमेवाले नाही. आम्ही यशवंतराव होळकरांची जयंती साजरी करायला आलोत. हे ऐकून
अपेक्षाभंग झालेले नागरीक तुच्छा कटाक्ष टाकत, कहां
कहांसे आते है वाली नजर करीत निघून गेले. यशवंतरावाशी काही देणं घेणं नाही. मी
चौकशी केली तेंव्हा कळलं तिथे फक्त एकच घर होळकरांचं आहे. बाकी सगळे शूर आम्ही
सरदारच्या पंक्तीतले. म्हटलं मग हा ठिक आहे, असं असेल तर मग
होळकरांची उपेक्षा होणारच. कारण ती आजच होते आहे असे नाही. ती सुरु झाली अगदी
मल्हारबाच्या काळापासून नि त्याचा प्रचिती आज मला प्रत्यक्ष होळकरांच्या वाफगावात
येत होती.
आम्ही गावाच्या वेशीतून होळकरांच्या वाड्याकडे निघालो. आजही ते गाव तसेच आहे
जसे तेंव्हा असावे. हा हा म्हणता वाड्याचा मुख्या दारात येऊन थडकलो. पाहतो काय तर
तो वाडा नव्हेच. अरे तो तर भव्य-दिव्य असा किल्ला आहे. त्याचं मुख्य दार हे
पुण्याच्या शनिवार वाड्यापेक्षाही मोठं आहे. आम्ही लगेच त्याचे फोटो काढले. म्हटलं
वाड्याचा गेट एवढा विशाल आहे? म्हटलं
असेल बुवा, पण आत जाऊन पाहतो काय तर साडेचार पाच एकरात
पसरलेली ही अजस्त्र वास्तू कुठल्याच बाबीत वाडा वाटत नव्हती. गाडी पार्क करुन
आम्ही ही होळकर वास्तू पाहायला निघालो. या वास्तूच्या भींती म्हणजे दोन दोन ट्रक
एकत्र जातील इतक्या भव्य नि रुंद. दोन नदिच्या संगमाचा कोपरा गाठून वास्तूच्या
तीन्ही बाजूला बारोमास पाण्याचा नैसर्गिक वेढा (खंदकरुपी) राहील अशा पद्धतीने
अत्यंत कल्पकतेने उभी केलेली ही विशाल वास्तू. त्याच बरोबर चारी बाजूला असलेली
जबरदस्त भींतीची तटबंदी. प्रत्येक बुरुज हा शत्रूवर नजर ठेवण्यासाठी उभा करण्यात
आलेला त्या काळातील बांधकामाचा सर्वोत्तम नमूना. सभोवताली अशी जबरदस्त भींत नि आत
मध्ये विशाल असा राजवाडा. आज पर्यंत आम्ही ईतका विशाल राजवाडा राहण्यासाठी बांधला
जातो हे पाहिलेच नाही. त्याच बरोबर एक बुरुजाच्या पोटात भव्य नि खोल विहीर
खोदलेली. ही विहीर तर आम्हाला चक्रावून सोडत होती. कारण किल्ल्याचं एकंदरीत
बांधकाम, बुरुज, अत्यंत रुंद व अभ्यद्य
भींती या एकंदरीत प्रकारानी आम्ही आधिच भारावून गेलो होतो पण ही बुरुजाच्या
पोटातील भव्य विहीर मात्र त्या काळातील उच्च कोटीच्या आर्किटेक्टचा अजोड नमूना
होता. हे सर्व पाहिल्यावर आम्ही त्या सर्व इतिहासकारांचा मनातून निषेध केला ज्याना
अशा विशाल नि अभ्यद्य अशा किल्याला वाडा म्हणून नोंदवून ठेवले. नंतर घरी आल्यावर
संजय साहेबानी बॉंबे गॅझिटर मध्ये संदर्भ तपासला तर तिथे इंग्रजानी याचा उल्लेख
फोर्ट असाच नोंदविला आहे. म्हणजे ही सर्व बदमाशकी या आमच्या म्हणवीणा-या ऐतद्देशीय
बुद्धिवंतांची आहे. आज पर्यंत सर्व इतिहासकारानी या वास्तूला वाडा म्हणून नोंदविले
आहे पण वास्तवात हा वाडा नसून एक अभ्यद्य तटबंदी असलेला भूईकोट किल्ला आहे.
जयंतीचा कार्यक्रम
किल्ला फिरुन झाल्यावर आम्ही किल्याच्या आत असलेल्या शाळेला भेट दिली.
कोळकरांचं कार्य समाजाच्या प्रती किती उदात्त नि उच्च कोटीचं होतं हे सांगायची गरज
नाही. समाज सेवेचा जन्मजात वारसा लाभलेल्या प्रत्येक होळकर राजाने जमेल तसे
समाजाचे ऋण फेडण्याचे काम केले आहे. त्यांच्या या समाजसेवी वृत्तीचा मोठा
अभिमानास्पद पुरावा या भव्य किल्याच्या आत आहे. तळागळातील लोकांपर्यंत शिक्षणाचा
तेजस्वी वारसा पोहचविण्यास कटिबद्द असलेल्या रयत शिक्षण संस्थेस हा भूईकोट
किल्ला होळकरानी दान दिला. होळकरांची दानशूरता नि समाजाभिमूख कार्य याचा एकंदरीत
वारसा पाहता त्यांच्याप्रतीचा आदर नकळतपणे द्विगुणीत होते. गोरगरीबांची पोरं
शिकावा, पुढे जावा अशी उत्कट ईच्छा बाळगणारा होळकर
कुटुंब आपली ऐतिहासीक वास्तू रयत शिक्षण संस्थेस देऊन मोठा उपकार केला. आज पर्यंत
हजारो विद्यार्थी त्या शाळेत शिकूण पुढे गेलेच.
तो पर्यंत ईकडे शाळेच्या पटांगणात जयंतईच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली.
साऊंड सिस्टम व मंडप आधीपासूनच टाकले होते. गावातील दोन चार अपवाद सोडत कुणी तिकडे
फिरकले सुद्धा नाही. पाहता पाहता दुपार उलटली तरी गावातले कुणी येईना. दर पाच दहा
मिनटानी एखादी कार येई. त्यातून चार पाच माणसं उतरत ती सर्व बाहेरुन येणारी लोकं
होती. शेवट पर्यंत जास्तीत जास्त पन्नासेक लोकं जमलीत. पण गावातली मात्र पाच-सात
माणसच होती. आम्ही चौकशी केली तेंव्हा कळलं की गावात एकूण साडेपाच हजार लोकसंख्या
आहे. म्हटलं अरे मग साधे शंभर दोनशे लोकही येत नाही हे काय आहे? तेंव्हा उत्तर मिळालं की त्याना ही जयंती वगैरे काहीच माहीत
नाही. किंवा आज पर्यंत ईथे कुणी काळ कुत्रही फिरकत नाही म्हणून लोकानी रस दाखविला
नाही. शेवटी आम्ही बाहेरून आलेले पन्नासेक जण गावातील पाच-सात माणसं आणि
रासपचे कार्यकर्ते अशी एकून साठ सत्तर लोकानी मिळूनच जयंती साजरी करण्याचे ठरविले.
महाराजा यशवंतराव होळकरांचे भव्य तैलचित्र मंचावर ठेवण्यात आले. मंगल
ध्वनीच्या गजरात त्याना पुष्पमाला अर्पण करण्यात आली. त्याच बरोबर द्विप प्रज्वलीत करुन नमस्कार करण्यात आला.
जमलेल्या सर्व कार्यकर्त्यानी मोठ्या उस्त्फूर्तपणे यशवंतरावांचा जयघोष केला. आभाळ
दुमदुमून जावे ईतका तो प्रचंड नव्हता पण मनाचा वेध घेणारा होता. एका शूर पुत्रास
सलामी देणारा तो अंतकरणातून निघालेला मानवंदनेचा गजर होता. जयजयकारानी सारा किल्ला
दुमदुमु लागला. सवादोनशे वर्षाच्या काळात प्रथमच एका उपेक्षित ठेवलेल्या वीर
पुत्रास, त्याच्या जन्मगावी मानवंदना देण्यात येत होती. ज्या
होळकर कुटुंबानी नुसतं आपल्या प्रांतापुर्ते कधीच न पाहता सर्व प्रांतातील लोकांची
सेवा केली, सामाजीक बांधिलकी जपली अशा कुटुंबातील वाळीत
टाकलेल्या एक राजपुत्रास अनेक वर्षाच्या उपेक्षे नंतर प्रथमच मोठ्या सन्मानाने नि
अभिमानाने जयंतीचे शुभौचित्त्य साधून सा-या
जगासमोर आणन्याचे कार्य पार पाडले. एका मागून एक सर्व मान्यवरांची भाषणं झालीत.
महादेव जानकर व सोनवणी साहेबांच्या तोजोमय भाषणानी उपस्थीत जनता भारावून गेली. हे
जयंतीचे पहिले वर्ष होते आज पन्नास साठ लोकांच्या उपस्थीतीत यशवंतराव होळकरांची
त्यांच्या जन्मगावी पहिली वहिली जयंती सुरु झाली. आता या साठाचे साठ हज्जार लोकं
होतील यात आम्हाला तिळमात्र शंका नाही. आम्ही सर्वजण आता दरवर्षी ३ डिसेंबरला
वाफगावात यशवंतराव होळकरांच्या जयंतीस जाणार, मोठ्या थाटात
जयंती साजरी करणार.
|
|
्बुरुजावरुन भींत
अशी दिसते.
|
धनगर समाजाची उदासिनता:
खरंतर यशंवतराव होळकरांच्या जयंतीस धनगर समाजाने जातीने उपस्थीत राहायला
पाहिजे होते. पण यशवंतरावांचे दुर्दैव आजून
संपायचे आहे. पश्चिम महाराष्ट्रा मोठ्या प्रमाणात असलेला हा समाज यशवंतरावा बद्दल
कमालीचा उदासीन असावा किंवा त्यांच हवं तसं प्रबोधन झालेलं नसावं. कारण काही असो
पण यशवंतरावाच्या जयंतीस धनगर समाजाची उपस्थीती अत्यंत महत्वाची नि अनिवार्य आहे.
आता तरी धनगरानी उठावे आणि पुढच्या वर्षी पासून मोठ्या संखेने महाराजा यशवंतराव
होळकर यांच्या जयंतीस हजेरी लावावी अशी आशा करतो. जय
मल्हाराच्या जयघोषानी वाफगाव नगरी दुमदुमून जाईल असा प्रचंड जनसमूदाय लवकरच तिथे
दाखल होईल एवढीच ईच्छा.
साभार --- एम.
डी. रामटेके.