Monday 20 January 2014

महाराजकुमारी भिमाबाई होळकर



 भारतीय स्वातंत्रलढ्यातील आद्य महिला स्वातंत्रसेनानी म्हणून इंग्रजांनी जिचा गौरव केला. जिने स्वबळावर इंग्रजांना सुद्धा पराभवाचे खडे चारले. अश्या स्ञी शौर्याच्या महानायिकेचा आज भारतीयांना विसर पडला ही खरच खेदाची गोष्ट आहे. कदाचित याला भारतीयांची जातीय मानसिकता कारणीभूत आहे असे म्हणता येईल.
 महाराजकुमारी भिमाबाई होळकर यांचा जन्म १७ सप्टे. १७९५ साली पुणे येथे झाला. आईचे नांव लाडाबाई तर पिता भारताचे आद्य स्वातंत्र्य सेनानी यशवंतराव होळकर. सन १७९७ साली होळकर कुटुंबियाची पुणे येथ छावणी पडली होती त्यावर शिंद्याच्या सैन्याने छापा घातला मल्हारराव होळकर (दुसरे) यांचा पुण्यात खुन केला. यशवंतराव विठोजींच्याही जीवावर शिंदे उठल्याने उभयतांना पुण्यातुन निसटुन जावे लागले. त्यानतंर शिंद्यांनी दोन वर्ष्याच्या भिमाबाईसहित होळकर कुटुंबाला कैदेत टाकले. पुढे त्यांना तब्बल सहा वर्षे कैदेत काढावी लागली पुढे त्यांची सुटका यशवंतरावांनी २५ आक्टोबर १८०२ रोजी पुण्यावर स्वारी करुन शिंदे पेशव्यांचा हडपसर येथे दणदणीत पराभव केल्यानंतर झाली. सुटकेनंतर मात्र यशवंतरावांनी भीमाबाईच्या शिक्षणाची लष्करी प्रशिक्षणाची सुरुवात केली.
 भिमाबाईनी १८०५ साली तिचे वडील यशवंतराव यांना लिहलेल्या पत्रातून तिचा राज्यकारभारात असणारा हस्तक्षेप किती महत्वपूर्ण होता हे दिसून येते. यशवंतरावांनी भानपुरा येथे सुरु केलेल्या तोफांच्या कारखान्याचे नवीन लष्कर भरतीचे काम पाहु लागल्या. त्यांना उत्तम अस्वपरिक्षा अवगत होती. त्यामुळे भारतभरातुन यशवंतरावांनी एक लक्ष घोडे आपल्या सैन्यासाठी विकत घ्यायचा सपाटा लावला होता त्यात मुख्य भुमिका भीमाबाई बजावत होत्या. १८०९ साली भिमाबाई होळकर यांचा विवाह गोविंदराव बुळे यांच्याशी झाला. परंतु अवघ्या दोनच वर्षात त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर काही महिन्यातच भिमाबाई यांचे वडील यशवंतराव यांचा  दुर्दैवाने मेंदुतील गाठीच्या आजाराने २८ आक्टोबर १८११ रोजी भानपुरा येथे अकाली म्रुत्यु झाला. एकापाठोपाठ ह्या दोन दुखद घटनांनी भिमाबाई पुरत्या खचल्या होत्या. परंतु त्यांनी लवकरच स्वताला सावरून घेतले. त्या राज्यकारभार स्वत सांभाळू लागल्या. काही दंगेखोरांनी राज्यात दंगा चालवला होता. दंगेखोराच्या बंदोबस्तासाठी भिमाबाई ह्या स्वत फौज घेऊन गेल्या आणि त्यांनी त्यांचा व्यवस्थित पणे बंदोबस्त केला.
 १८१७ साली इंग्रजांनी होळकर राज्याविरुद्ध युद्ध पुकारले. १९ डिसेंबर १७१७ ला म्हणजे महिदपुरच्या लढाईचा आद्ल्या दिवशी, गफुरखानने फुटीर सैन्यासोबत मिळून तुळसाबाईं यांचा खून केला आणि त्यांचे प्रेत क्षिप्रा नदीत फेकुन दिले. त्यांच्यावर कसलेही अंतिम संस्कार करता आले नाही. नंतर गफुरखानही होळकरी सैन्यात येउन सामील झाला. महिदपुरचे युद्धात सर थोमस हिस्लोप हा इंग्रज सैन्याचे नेत्रुत्व करत होता...युद्ध सुरु झाले. इंग्रज अधिका-यांनीही नंतर नवलाने लिहिले आहे कि ११ वर्षाचा मल्हारराव हत्तीवरुन रनभुमीवरुन फिरत होता...आपल्या सैन्याला उत्तेजन देत होता. त्याला कसलीही भिती वाटतांना दिसत नव्हती. भिमाबाईही स्वत: या युद्धात घोडदळाचे नेत्रुत्व करत लढत होती. दुपारपर्यंत या युद्धाचा कल होळकरांकडे होता. इंग्रजांची या युद्धात खुपच हानी झाली. हिस्लोपला वाटले आता माघार घ्यावी लागणार...पण गफुरखानाने अचानक आपल्या सैन्यासह पळ काढला. त्यामुळे होळकरी सैन्यात एकाएकी संभ्रम माजला...गोंधळाचा फायदा घेवुन हिस्लोपने तोफांचा मारा वाढवला...होळकरी सैन्यातही फाटाफुट झाली. होळकरांचा प्रथमच इंग्रजांनी पराभव केला. याची परिणती मंदसोर येथील जानेवारी १८१८ च्या तहात झाली. दुसऱ्या बाजीरावने इंग्रजाशी केलेल्या १८०२ सालच्या वसई तहात आणि मंद्सोर येथील तहामुळे मराठ्यांच साम्राज्य जानेवारी १८१८ ला पूर्णत संपुष्टात आले. 
होळकरांना आपले अनेक प्रांत गमवावे लागले. या युद्धातील पराजयामुळे शेवटचे स्वतंत्र सार्वभौम राज्य नष्ट झाले. तह झाला पण भिमाबाई हरली नव्हती. पण भीमाबाई मात्र आपल्या तीन हजार पेंढारी घोडदळानिशी निसटली होती. इंग्रजांशी तिचा लढा थांबणार नव्हता. तिने अक्षरश: अरण्यवास पत्करला पित्याच्या पावलावर पाऊल ठेवत गनीमी काव्याचा मंत्र जपला. तिने माल्कमच्या सैन्यावर गनीमी हल्ले सुरु केले. इंग्रज खजीने लुटले. अनेक तळ उध्वस्त केले. मार्च १८१८ मद्धे तर खुद्द माल्कमच्या सेनेला अचानक हल्ला करुन असे झोडपले कि माल्कमलाच पळुन जावे लागले. इंग्रजांनी भीमाबाईची खरी शक्ती तिचे पेंढारी इमानदार सैन्य आहे हे लक्षात घेवुन पेंढा-यांविरुद्धच मोहीम हाती घेतली. पेंढा-यांना पुनर्वसनाच्या, जमीनी-जागीरी देण्याच्या आमिषांचीही बरसात केली. त्यामुळे अनेक पेंढारी भीमाबाईला सोडुन जावु लागले. आपल्या पित्याप्रमानेच भीमाबाईने भारतातील सम्स्थानिकांना बंड करण्याची पत्रे पाठवण्याचा सपाटा लावला होता पण कोणीही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. माल्कम तर पिसाळुन भीमाबाईच्या सर्वनाशासाठी भीमाबाईचा माग काढत होता, पण भीमाबाई आज येथे तर उद्या तिथे. तिने इंग्रजी तळांना अचानक हल्ले करुन लुटण्याचा धडाका लावलेला होता. भीमाबाईवरील मोहीम यशस्वी व्हायचे नांव घेत नव्हती. माल्कमने पुन्हा कपटाचा आश्रय घेतला. त्याने भीमाबाईचा मुख्य सेनानी रोशन खान ह्यालाच फितुर करुन घेतले. भीमाबाईचा तळ धारनजिक पडला असतांना त्याने ती खबर माल्कमला दिली. माल्कमने तातडीने विल्ल्यम केइर या नजिक असलेल्या सेनानीला भीमाबाईवर हल्ला करण्यास पाठवले. चहुबाजुंनी घेराव पदला. यावेळीस दुर्दैव असे कि एकाही सैनिकाने शस्त्र उचलले नाही. ते सरळ भीमाबाईला एकाकी सोडुन निघुन गेले. भीमाबाईला कैद करण्यात आले. रामपुरा येथील गढीत त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. पण तिच्या स्वातंत्र्याकांक्षेची नोंद अवघ्या जगाने घेतली ती भारताची पहिली महिला स्वातंत्र्यसेनानी म्हणुन! पण भारतीय जातीयवादी मंडळीना हे पचणार कसे, कारण ह्यांच्या झाशी या छोट्याश्या गावच्या बाईच महत्व कमी होऊ नेय म्हणून एक बनावट पत्र प्रसारित करण्यात आले त्यात १८५३ साली भिमाबाई यांना वेड लागले असे दाखवण्यात आले. मुळात ह्या पत्राखेरीज असा उल्लेख कुठेही आढळून येत नाही...त्यामुळे आजवर होळकरांची बदनामी करणाऱ्या ह्या अनेक खोट्या गोष्टीला महत्व देणे हेच योग्य ठरेल. २८ नोव्हे. १८५८ रोजी भिमाबाई होळकर यांचा मृत्यू झाला आणि भारतीय स्वातंत्र्य इतिहासातील एका रणरागिणीचा अंत झाला.
 जागतिक इतिहासात स्वताचा ठसा उमटवणारी ही रणरागिणी, मात्र भारतीय इतिहासात अश्या महानायिकेला  जाणून बुजून दुर्लक्षित ठेवण्यात आली...अश्या ह्या आद्य महिला स्वातंत्र्य सेनानी महाराजकुमारी भीमाबाई होळकर यांना कोटी कोटी प्रणाम...

संदर्भ –    

A History of the Mahrattas - James Grant Duff


वीरांगना भिमाबाई - राजेंद्र मिलन,
भारताची पहिली महिला स्वातंञ्यसेनानी, स्ञी शौर्याची महानायिका भीमाई होळकर - होमेश भुजाडे,
आद्य महिला स्वातंत्र्य सेनानी भीमाबाई होळकर ! – संजय सोनवणी
तसेच प्रसिद्ध इतिहासकार संजय क्षीरसागर यांचे खासे मार्गदर्शन झाले...

- सचिन शेंडगे (९८६०३२४३८४)

2 comments: