Friday 20 December 2013

महादजी शिंदेंचा महाराजा यशवंतराव होळकरांनी केलेला पराभव...


 होळकर घराण्याच्या अनेक पराक्रमापैकी हा आणिखी एक पराक्रम जो महाराजा यशवंतराव होळकर यांनी केवळ वय वर्ष १६ असताना केला होता, परंतु होळकरद्वेष्ट्या इतिहासकारांनी जाणून बुजून दडवून ठेवण्यातच आजवर धन्यता मांडली. मुळात जिंकलेले युद्ध होळकरांनी कशी हरली किंवा होळकर घराण्यातील पुरुष मंडळीला दारूचे किती व्यसन हे रंगवून सांगणे ह्या पलीकडे ह्या तथाकथित इतिहासकार मंडळीन दुसरे काही जमले नाही. 
 १७९३ च्या शिंदे व होळकर यांच्यामध्ये झालेल्या लाखेरीच्या युद्धानंतर असे सांगितले जाते कि होळकरांचा पूर्णपणे पराभव झाला व तसेच शिंदेच्या सैन्यांनी होळकर सैन्याचा हर एक सैनिक कापून काढला. पण मुळात ऐतिहासिक कागदपत्रे व्यवस्थितपने तपासून पहिली तर काहीसे वेगळे सत्य बाहेर पडते. लाखेरीच्या युद्धानंतर शिंद्याचे जगोबा बापू व पेरॉन हे सरदार आपल्या पांच हजार व दोन पलटणीसह होळकरांच्या सैन्याचा पाठलाग करत होते. हा पाठलाग अगदी कोटापर्यंत चालू होता व पण यावेळी होळकरच्या सैन्याचे नेर्तत्व हे यशवंतराव होळकर यांच्या कडे होते कारण मल्हारराव (दुसरे) होळकर  जखमी होते. होळकर सैन्य कोटा येथे पोहचल्यानंतर मात्र यशवंतराव होळकर यांनी आपल्या सपाट प्रदेशातील गनिमीकाव्याच्या तंत्राने (जो कि मल्हारतंत्र याही नावाने ओळखला जातो) महादजी शिंदेच्या सैन्याचा खरपूस समाचार घेतला व पराभव केला. तसेच पुढे जाऊन राजपूत मांडलिक झाला जालीम सिंग याचे झालरापटन हे शहर लुटले. घाबरलेल्या जालीम सिंगने होळकरशी गुप्त मैत्रीपूर्ण बैठक घेऊन खंडणी देण्याचे मान्य केले. इतकेच काय तर होळकरांनी पुढे जाऊन शिंदेच्या राजधानी म्हणजेच उज्जैन देखील उध्वस्त केली.
 कोटा येथील लढाईचे वर्णन विसाजी वाडदेकर यांनी बालासाहेबास ११ जुलै १७९३ च्या पत्रात लिहून कळविले आहे ते पत्र खाली देत आहे.

नं. ३५२०                                                   आषाढ शु. ३ -- ११ जुलै १७९३
   पुण्याहून विसाजी नारायण वाडदेकर याचे मिरजेस बाळासाहेबांस पत्र
 " विज्ञापना. इकडील वर्तमान तर आर्द्रा नक्षत्र अगदी पर्जन्य पडला नाही. पुनर्वसु निघाल्यावर दोन दिवस मात्र थोडा थोडा पर्जन्य पडला. फिरून उष्ण चांगले पडले. महागाईचा अनर्थ जाला आहे. शिंदे यांची जाण्यायेण्याची कांही बोलवा नाही. स्वस्थ बसले आहेत ! होळकर यांजकडे बळवंतराव काशी कात्रे पाठवावयाची तयारी केली आहे. होळकर कोट्याचे सुमारे आले. मागाहून शिंदे यांची फौज पांच हजार व दोन पलटणे होती त्यांजवर होळकर यांणी छापा घातला. नासाडी फार जाली म्हणोन बातमी आली आहे. नबाब फौज ठेवितो म्हणून आवई घातली आहे. इंग्रजांचे बोलणे पडले आहे, " आम्ही पुढे एकादी मसलत केली तरी त्यास तुम्ही शरीक आहां कीं नाही ?" तेव्हां या कलमाची वाटाघाट चार महिने होत आहे. शेवटी उत्तर सांगितले, " तुमचा आमचा करार ठरला ते समयीच दार मदार जाले आहेत. आतां नवे लिहून द्यावयाचे काय आहे ? पहिलेच करार जाले आहेत." म्हणोन उत्तर सांगितले. स्वामींस कळावे. सेवेशी श्रुत होय हे विज्ञापना."
संदर्भ ग्रंथ :-
१) ऐतिहासिक लेखसंग्रह भाग - ९ :-  वासुदेव वामन खरे      

 वरील पत्रावरून सरळ स्पष्ट होते कि होळकरांचा पाटलाग करणाऱ्या शिंदेच्या सैन्याचे कार्य झाले असेल, अगदी हीच अवस्था कर्नल मानसन झाली होती ते ही होळकरांच्या सैन्याचा पाठलाग करत असताना आणि तेही जून-जुलैच्या भर पावसाळ्यात आणि त्याच परिसरात कर्नल मोन्सनच्या दहा हजार सैनिकांच्या संपूर्ण पलटनीला क्रमाक्रमाने कापून काढत महाराजा यशवंतराव होळकर यांनी ह्याच पद्धतीने लढल्या गेलेल्या युद्धात विजय संपादन केला होता.
 कोटा येथील केलेल्या पराक्रमामुळेच कि काय पुढे जाऊन १७९५ साली झालेल्या निजामाविरुध्च्या खर्ड्या येथील युद्धात सुभेदार तुकोजीराव होळकर यांनी यशवंतराव होळकर यांना महत्वाची जबाबदारी दिली असेल. खर्ड्या येथील झालेल्या युद्धात देखील यशवंतराव होळकर यांनी निजामालासुद्धा पराभवाचे खडे चारले.
 कोटा येथील झालेल्या लढाईत महाराजा यशवंतराव यांनी महादजी शिंदेचा पराभव केला त्यावेळी त्यांचे वय होते फक्त १६ वर्ष... कदाचित या पराक्रमामुळे १७९३ पासूनच यशवंतयुगाची सुरवात झाली असेही म्हणता येईल.

संदर्भ :-
ऐतिहासिक लेखसंग्रह भाग - ९ :-  वासुदेव वामन खरे   
होळकरशाहीच्या इतिहासाची साधने :- अनंत नारायण भागवत
Maratha-Rajput Relations from 1720 to 1795 A.D. - K. A. Acharya
Maratha relations with the major states of Rajputana, 1761-1818 A.D. - Rajendra Kumar Saxena
http://peshwekalinitihas.blogspot.in/2013/07/blog-post_30.html
 व तसेच या इतिहासलेखनासाठी महत्वपूर्ण माहिती मिळवण्यास प्रसिद्ध इतिहासकार संजय क्षीरसागर यांची खासी मदत जाहली...

- सचिन शेंडगे (९८६०३२४३८४)


4 comments:

  1. Nice keep up the good work.

    What are current Holkar descendants doing ? Why are they not active in electoral politics like shinde.

    ReplyDelete