Saturday 21 December 2013

महाराजा यशवंतरावांची दिल्लीची स्वारी..


 महाराजा यशवंतराव होळकर यांच्या दिल्लीच्या पहिल्या स्वारीत अमूप लुट मिळाली, परंतु इतिहासात महाराजांची आजवर सर्वात दुर्लक्षित राहिलेली दिल्लीची पहिली स्वारी. महाराजांची दिल्लीची दुसरी स्वारी ही भवानी शंकर खत्रीच्या गद्दारीमुळे व त्याच्या निमकहरामची हवेली या नावाच्या हवेलीमुळे तशी बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे.
 या स्वारीमागचे मुख्य कारण म्हणजे महाराजाकडून सलग पराभवामुळे इ. स. १८०१ च्या नोव्हेंबर डिसेंबर या दोन महिन्यात दौलतराव शिंद्यांनी स्वतास उजैनीत कोंडून घेतले होते आणि भोवती महाराजाची पन्नास हजार फौज घिरट्या घालत होती व त्यांच्या देखत त्यांचा मुलुख लुटीत होती. शिंद्यांनी उज्जैनबाहेर पडून मैदानात यासाठी महाराजानी शिकस्तीचे प्रयत्न केले. शत्रूशी मैदानात गाठ घालण्याचे आपले पर्यंत फुकट गेलेले पाहून यशवंतरावांनी जानेवारीपासून एक नवीनच डाव खेळण्याचे मनात आणले, ग्वालेरप्रांत हा शिंद्याच्या जहागिरीपैकी सर्वात मोठा प्रांत होता. ग्वालेरच्या पलीकडील आग्रा, मथुरा, दिल्ली वैगरे शहरावर मोगल बादशाहतर्फे अंमल बजावण्याची चाकरी महादजी शिंदे यांनी मिळवलेली होती. त्यामुळे शेवटी दिल्ली दरबारातून उच्चाटण करण्याचे भय दाखवावे म्हणजे आपल्या पाठलागावर दौलतराव शिंदे आपोआपच मैदानात येतील असा अंदाज बांधून यशवंतरावानी आपली स्वारी दिल्लीकडे वळवली. वाटेत मंडोसर चार लाख, रतलाम तीन लाख, झाबडी दोन लाख अश्या ठिकठिकाणी जबरदस्त खंडण्या उकळल्या व सर्व प्रांत लुटून फस्त केले. मार्चमध्ये होळकरी सैन्य दिल्लीपासून अवघ्या ५० कोसावर जाऊन पोहचले. त्यांच्या पिछ्यावर  शिंद्यांनी दोन फलटणे व थोडे सैन्य पाठवले परंतु ही फौजही होळकरी सैन्याला रोखू शकली नाही. आणखी चार आठ दिवसात महाराजाची स्वारी दिल्लीवर जाऊन आदळणार असा रंग दिसू लागला. आर्थिकदृष्ट्या महाराजाची ही स्वारी सर्वस्वी यशस्वी झाली. परंतु त्यांचा मुख्य हेतू दौलतराव शिंदेला मैदानात ओढण्याचा बिलकुल सध्या झाला नाही.
 महाराजांना या दिल्लीच्या स्वारीत आणखीही पुष्कळ लुट मिळवता आली असती. परंतु गरीब रयतेला विनाकारण मारून द्रव्य मिळवावे या गोष्टीत त्यांना कोणताच पुरूष्यार्थ वाटत नव्हता. शत्रूला कसेही करून मैदानात ओढावे एवड्याकरीताच हा सर्व खटाटोप केला होता. ‘सूड सूड’ एवढा एकच शब्द त्यांच्या हृदयाकाशात सतत उमटत होता ! 
 दिल्लीची दिवाणगिरीत घालमेल करण्याचे भयं दाखवूनही दौलतराव शिंदे हा मैदानात आला नाही त्यामुळे महाराजांनी दक्षिणेत स्वतः जाऊन बाजीरावसाहेबांचा गळा पकडावा असा विचार केला आणि आपले स्वारी दक्षिणेकडे वळवली.

संदर्भ ग्रंथ ---
वासुदेव वामन खरे _ ऐतिहासिक लेखसंग्रह भाग - १३ व १४ _ संपादक – यशवंत वासुदेव खरे.
व तसेच प्रसिद्ध इतिहासकार संजय क्षीरसागर यांची खासी मदत जाहली...

- सचिन शेंडगे (९८६०३२४३८४)



1 comment: